ठाणे – अंधेरीहून विरारकडे जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाडीत आपल्या चार बालकांना घेऊन चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला बालकांना गाडीत चढवल्यानंतर स्वताला मात्र तेथे चढता आले नाही, तेव्हढ्यात ही गाडी सुटल्याने या महिलेची व बालकांची ताटातूट झाली. पण एका महिला उपनिरीक्षकाच्या तत्परतेमुळे या बालकांचा लगेच शोध लागला आणि ही मुले आईच्या कुशीत विसावली.
26 जानेवारी रोजी हा प्रकार घडला. सदर महिला आपल्या सासूबाई आणि चार मुलांसह अंधेरीहून विरारला चालली होती. ही मुले सहा ते अकरा वर्ष वयोगटातील आहेत. गाडीला त्यावेळी मोठी गर्दी होती. पण आधी आपण मुलांना गाडीत चढवू आणि नंतर सासुबाई आणि आपण गाडीच चढू असा विचार तिने केला. त्यानुसार तिने मुलांना आत चढवले पण त्यानंतर लोकल गाडी लगेच पुढे निघाली.
या दोन्ही महिला मागेच राहिल्या. त्यानंतर मुलांना शोधण्यासाठी या दोन्ही महिला चर्चेगेट ते मीरारोड या लोकल मध्ये चढल्या. त्याच लोकल मधून महिला उपनिरीक्षक उज्जवला अर्के या प्रवास करीत होत्या. त्यांना तेथे या दोन महिला रडत असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली त्यावेळी त्यांनी हा प्रकार उपनिरीक्षकांना कथन केला. त्यानंतर या उपनिरीक्षकाने रेल्वे कंट्रोल रूम आणि रेल्वे पोलिसांना या प्रकरणाची मोबाईवरून माहिती दिली.
त्यानंतर तातडीने सर्व रेल्वे स्थानकांवरील पोलिसांना ही माहिती कळवण्यात आली. त्यानुसार ठिकठिकाणच्या पथकांनी गाड्यांची तपासणी सुरू केली. त्यावेळी त्यांना बोरिवली स्थानकावर ही मुले कोणत्याही पालकांशिवाय प्रवास करीत असलेली आढळून आली. त्यांनी या मुलांना उतरवून घेतले आणि नंतर ती मुले तिच्या आईच्या ताब्यात सुखरूपणे दिली गेली. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे अल्पावधीतच या मुलांची व आईची भेट होऊ शकली.