मुंबई :- राज्यात पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची स्थिती गंभीर बनली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारकडून अजूनही ठोस पावले उचलली जात नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. इतर मंत्र्यांची फळी तयार झालेली नसल्याने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना कामासाठी वेळ कमी पडत असल्याचे सांगत सरकारने लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन करावे, असे छगन भुजबळ म्हणाले.
अनेक ठिकाणी शेती, लोकांची घरे वाहून गेली आहेत. शंभरहून अधिक व्यक्ती पुरामध्ये मृत्यूमुखी पडले आहेत. पूर्ण मंत्रिमंडळ बनल्यास स्वतंत्रपणे मंत्री त्या कामाला लागतील. त्यामुळे लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापनेची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
मुख्यंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्यांवर प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले की, आज राष्ट्रपतींच्या शपथविधीसाठी त्यांनी जाणे अपेक्षित होते. त्यामुळे याबाबत टीका करणे योग्य नाही. मात्र इतर वेळेस होणाऱ्या दिल्ली दौऱ्यांबाबत आपण निश्चित बोलू शकतो. राज्यातील सद्यस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त वेळ राज्याला द्यायला हवा. खातेवाटप पूर्ण झाल्यास यातून लोकांच्या प्रश्नांना न्याय देता येऊ शकेल, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.
शिवाय विविध विकासकामांवर आणलेल्या स्थगितीवर छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. ज्या कामांबाबत शंका असेल त्यावर स्थगिती आणणे ठीक आहे. मात्र सर्रास विकासकामांवर स्थगिती आणणे योग्य नाही. यावर विरोधी पक्ष निश्चितपणे आपली भूमिका मांडेल, असे भुजबळ म्हणाले.