बंगलुरू – करोना प्रसारामुळे देशात जी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळे भारतातील नागरिक राजकारण आणि धर्म या दोन बाबींपासून दूर राहण्यास शिकले, असे निरीक्षण इस्त्रोचे माजी प्रमुख जी माधवन नायर यांनी नोंदवले आहे. ही एक मोठी उपलब्धी आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, देशातील हा ट्रेंड असाच कायम राहिला पाहिजे. प्रत्येक निवडणुकीनंतर राजकारण हा विषय मागे टाकून प्रत्येकाने राष्ट्र उभारणीच्या कामावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे.
करोनाच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की, अशा प्रकारचे विषाणू पृथ्वीवर अस्तित्वात असतातच, जेव्हा त्यांच्या वाढीला अनुकूल वातावरण लाभते त्यावेळी त्यांची अचानक मोठी वाढ होते आणि अशा समस्या उद्भवतात. गेली तीन शतके आपण पाहिली तर प्रत्येक शंभर वर्षात अशा प्रकारची समस्या कधीना कधी उद्भवली आहे. त्यामुळे करोनाचा हा प्रसार नैसर्गिक स्वरूपाचा आहे असेहीं त्यांनी म्हटले आहे.
हा प्रसार भारतात रोखण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चांगले प्रयत्न केले आहेत. प्रत्येक अडचणीचा मुकाबला करीत आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एक चांगली लय पकडली आहे, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे. भविष्यातील अशा प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यासाठी भारतीय उद्योगाने आणि संशोधन संस्थानी स्वदेशी बनावटीची उपकरणे मोठ्या प्रमाणात उत्पादित करावीत, अशी अपेक्षाही नायर यांनी व्यक्त केली आहे.