विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा आरोप
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली बंद पाईपलाईन योजना सत्ताधारी भाजपाच्या दुटप्पी धोरण आणि नाकर्तेपणामुळे गुंडाळली जाण्याची भिती आहे. शहरावरील पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी बंद पाईपलाईन योजना आणि भामा आसखेडहून शहरासाठी होणारी पाईपलाईन योजना मार्गी लागण्याची गरज असून या दोन्ही योजना तात्काळ मार्गी लावाव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.
याबाबत साने यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना बंद पाईपद्वारे शुध्द आणि मुबलक पाणी मिळावे या हेतूने तात्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवना बंद पाईपलाईन योजनेच्या प्रकल्पाची संकल्पना मांडली होती तर महापालिकेने या प्रकल्पाला मंजुरीही दिली होती.
2008 साली हा प्रकल्प जाहीर करण्यात आला होता. मात्र, मावळमधील भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी त्याचे राजकारण करुन या योजनेला विरोध केला. हा प्रकल्प अद्यापही प्रलंबित असून आता लोकांना बंद पाईप लाईन प्रकल्प पूर्ण होऊन शुध्द पाणी मिळण्याची अपेक्षा असतानाच ठेकेदारांनी काम बंद करण्याचे पत्र महापालिकेला दिले आहे. त्यामुळे, ही योजना गुंडाळली जाण्याची भिती असून यासाठी सत्ताधारी भाजपचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचा आरोप साने यांनी केला आहे.
मागील अडीच वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, शहराच्या विकासासाठी योजना पूर्ण करण्यात भाजपला अपयश आले आहे. पवना धरणातून रावेत बंधाऱ्यापर्यत पाणी येताना नदीपात्रात परिसरातील कंपन्यांचे प्रदूषित पाणी, मैलामिश्रीत पाणी थेटपणे नदीत सोडल्याने रावेत बंधाऱ्यातील पाणी अशुध्द होऊन तेच पाणी शहरातील नागरिकांना प्यावे लागत आहे. तसेच, पवना जलवाहिनीचा वादग्रस्त प्रकल्प व मावळातील शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात सत्ताधारी पक्षाने बोटचेपी भूमिका घेतली आहे. पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची गरज लक्षात घेऊन व मावळमधील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प मार्गी लावावा, असेही या पत्रकात साने यांनी म्हटले आहे.