हरिद्वार – पुढील वर्षी हरिद्वार येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्याच्या दरम्यान जवळच्या अभयारण्यातील हत्तींचा उपद्रव होऊ नये यासाठी वन विभागाने योजना तयार केली आहे. हत्ती लोकवस्तीत येऊ नयेत यासाठी गंगा नदीच्या किनाऱ्यावर तीन ठिकाणी प्रत्येकी एक किलोमीटर लांबीची आणि दोन मीटर उंचीची भिंत बांधण्यात येणार आहे.
त्याचबरोबर 17 किलोमीटरचे सौर उर्जेवर चालणारे कुंपणही घालण्यात येणार आहे. यासाठीचा तपशीलवार अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. हरिद्वारपासून 43 किलोमीटर अंतरावर राजाजी नॅशनल पार्क आहे. हत्तींसाठी प्रसिद्ध असणारे हे अभयारण्य सुमारे 820 चौरस वर्ग किलोमीटर क्षेत्रावर वसलेले आहे.
या अभयारण्यात सुमारे 113 हत्ती असून ते अनेकदा नागरी वस्त्यांमध्ये घुसतात. अनेकदा पिकांचे नुकसान करतात. काही घटनांमध्ये नागरिकांना जीवही गमवावा लागलेला आहे. त्यामुळे महाकुंभाच्या काळात हत्तींची ये-जा असणार मुख्य मार्ग रोखण्यासाठी वन विभागाने कार्ययोजना तयार केली आहे.
त्यानुसार कनखल बैरागी कँप येथे गंगा नदीच्या काठावर एक किलोमीटर लांब आणि दोन किलोमीटर उंच भिंत बांधली जाईल. त्याचबरोबर अजितपूर-कटारपूर येथे आणि पंजनहेडी याठिकाणी एक-एक किलोमीटर लांबीची भिंत बांधण्यात येणार आहे.
हा सगळा परिसर जंगलाला लागून आहे आणि त्यामुळे हत्तींसाठी येण्याजाण्याचा प्रमुख मार्ग आहे. भिंती बांधल्यामुळे हत्तींचे येणे-जाणे थांबेल असा वनविभागाचा दावा आहे. त्याचबरोबर हरिद्वारपासून भोगपूर-लष्करपर्यंत 17 किलोमीटरचे सौरउर्जेवरील कुंपण घालण्यात येणार आहे.
1 जानेवारी ते 30 एप्रिल 2021 या काळात कुंभमेळा होणार असून तोपर्यंत ही कामे पूर्ण होणे अशक्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र मनुष्यबळ, मटेरियल आणि नियोजन असेल तर काहीच अशक्य नाही असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
उत्तराखंडातील हत्ती आणि माणूस यांच्यातील संघर्षासंदर्भात केंद्र सरकारचे हत्तींविषयीचे राष्ट्रीय समन्वयक मुथामिझ सेल्वन यांच्या नेतृत्वाखालील लवकरच भेट देणार आहे.