पाथर्डी, (प्रतिनिधी): थोर स्वातंत्र्यसेनानी माजी आमदार स्व. बाबुजी आव्हाड हे सर्वसामान्यांसाठी भगवंताचे रूप होते. पाथर्डीतील गोरगरीब जनतेसाठी त्यांनी केलेला त्याग व त्यांची सामान्यांप्रती असणारी तळमळ त्याअर्थी ते पाथर्डी तालुक्याचे भाग्यविधाते ठरतात.
त्यांनी उसतोडणी कामगारांच्या, तसेच गोरगरीब मुलांसाठी शिक्षणाची गंगोत्री तालुक्यात आणली. त्यांनी शेवटपर्यंत सर्वसामान्यांच्या सुखासाठी आयुष्य वेचले म्हणूनच चंद्र, सूर्य असेपर्यंत बाबूजींचे कार्य अजरामर राहील, असे प्रतिपादन शंकर महाराज मठाचे मठाधिपती महंत माधवबाबा यांनी केले.
येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात स्व. बाबुजी आव्हाड यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना बोलत होते. यावेळी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, प्राचार्य डॉ.जी. पी. ढाकणे, विश्वस्त महावीर मुनोत, दिलीप गर्जे, माणिकराव बुधवंत, बापूराव भावसार, मधुकर पालवे, जेष्ठ पत्रकार अविनाश मंत्री, सुखदेव मर्दाने, विवेकानंद विद्या मंदिरचे मुख्याध्यापक शरद मेढे,
अनुजा कुलकर्णी आदी उपस्थित होते. डॉ. अशोक कानडे, अविनाश मंत्री व संजय बुधवंत यांनी विचार मांडले. अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने १५ गरीब व होतकरू मुलींना सायकल वाटप माधवबाबा यांच्याहस्ते करण्यात आले. विश्वस्त महावीर मुनोत यांनी दीड लाख रुपये किमतीचा इ-लर्निंग डिजीटल बोर्ड भेट दिला. ग्रंथालय पुस्तकांसाठी निवृत्त प्रा. रामहरी वीर यांनी ५१ हजार व प्रा. सुनील बडे यांनी ५ हजारांची देणगी दिली. सूत्रसंचालन प्रा. शेखर ससाणे तर आभार प्राचार्य डॉ. ढाकणे यांनी मानले.