सातारा -जिल्ह्यात माण, खटाव, कोरेगाव, वाई, पाटण, सातारा तालुक्यातील 18 गावे 30 वाड्यावस्त्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. कराड तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने सुरू असलेला एक टॅंकर बंद करण्यात आला. फलटण, खंडाळा, जावळी या तालुक्यांत अद्याप एकही टॅंकर सुरू नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे यांनी दिली.
एकीकडे करोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असताना आता जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ही समस्या कमी जाणवत असल्याने प्रशासनाने थोडासा सुटकेचा निःश्वास टाकला आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर आवश्यक उपाययोजना आखल्या आहेत. माण तालुक्यात चार गावे, 18 वाड्यांमधील 4307 लोकांना तीन टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. पांगरीच्या नऊ वाड्या, वडगावच्या चार वाड्या, वारुगडच्या पाच वाड्या व बिजवडी गावठाणाचा त्यात समावेश आहे.
खटाव तालुक्यात गारवडी, आवळे पठार,अनफळे याठिकाणी 1122 लोकांना व 758 पशुधनाला एका टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. कोरेगाव तालुक्यात भंडारमाची व भाटमवाडी, शेल्टी या तीन गावांत टॅंकरने पाणीपुरवठा होत असून या पाण्यावर 1763 ग्रामस्थ आणि 1315 पशुधन अवलंबून आहे. वाई तालुक्यात मांढरदेव, बालेघर, बोपर्डी, धनगरवाडी, गडगेवाडी या ठिकाणी 2787 ग्रामस्थ आणि 1276 पशुधनासाठी टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे.
पाटण तालुक्यात किल्ले मोरगिरी, अंब्रूळकरवाडी (भोसगाव), चव्हाणवाडी (नाणेगाव), शिद्रुकवाडी, शिद्रुकवाडी (वरची),मुद्रुलवाडी (कालगाव) या गावांतील 3283 ग्रामस्थ आणि 1513 पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. सातारा तालुक्यात आवाडवाडी, निकामवाडी, पिसानी, चोरगेवाडी याठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा होत असून 740 ग्रामस्थ आणि 185 पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. कराड तालुक्यात मस्करवाडी येथे टॅंकरने पाणीपुरवठा होत होता. मात्र, या भागात चांगला पाऊस झाल्याने येथील टॅंकर बंद करण्यात आला आहे. महाबळेश्वर तालुक्यात आचले आणि भीमनगर याठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. येथील 460 ग्रामस्थ आणि 34 पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. फलटण, खंडाळा, जावळी या तालुक्यांत अद्याप पाणी टॅंकरची मागणी नसल्याची माहिती सुनील शिंदे यांनी दिली.