नवी दिल्ली – वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणे जीवावर बेतते आणि त्यातून कित्येक कुटुंबे उद्धवस्त होतात. केंद्र सरकारकडून 2022 मधील रस्ते अपघातांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सन 2022 मध्ये देशात एकूण 6 लाख 61 हजार 312 अपघातांची नोंद झाली. यामध्ये 1 लाख 68 हजार 941 जणांना प्राण गमवावे लागले. तर 4 लाख 45 हजार लोक जखमी झाले.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) जारी केलेल्या अहवालानुसार, 2022मध्ये 2021 च्या तुलनेत भारतात अपघातांची संख्या सुमारे 12 टक्क्यांनी वाढली आहे तर रस्ते अपघातातील मृत्यूची संख्या 9.4 टक्क्यांनी वाढली आहे. 2022 मध्ये जखमी लोकांच्या संख्येत 15.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पोलिसांद्वारे सामायिक केलेल्या माहितीच्या आधारे MORTH रस्ते अपघातांवरील हा वार्षिक अहवाल तयार करते.
अहवालातील ठळक नोंदी –
– पार्क केलेल्या वाहनांना अपघातांच्या घटनांमध्ये एका वर्षात सुमारे 22% वाढ, अशा अपघाताच्या 71,146 घटना
– समोरा-समोर वाहन धडकल्याने होणारे अपघात संख्या 2.1% वाढली आहेत. अशा अपघाताची 77,886 प्रकरणे
– अपघातांमध्ये मागून धडक दिल्याने झालेले अपघात सर्वाधिक 21.4% होता आणि तो 2021 (21.2%) च्या तुलनेत वाढला आहे.
– 2022 मध्ये देशातील प्रत्येक 100 अपघातांमध्ये 36 लोकांचा मृत्यू झाला.
– चंदीगड, मध्य प्रदेश, दिल्ली याठिकाणी अपघातांचे प्रमाण कमी. या सरासरीपेक्षा जास्त मृत्यू बिहार, पंजाब, झारखंड, यूपी, गुजरात, हरियाणा, राजस्थानमध्ये झाले आहेत.
– एका वर्षात रेड लाइट जंपिंग प्रकरणांमध्ये 82.5% वाढ झाली आहे. ओव्हर स्पीड प्रकरणांमध्ये 12.8% वाढ.
– 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये 2022 मध्ये दिल्लीत सर्वाधिक अपघात
– इंदूर-जबलपूर दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर
– 2020 च्या तुलनेत या शहरांमध्ये अपघात आणि मृत्यू वाढले
रस्ते अपघात होण्याची कारणे –
ओव्हरस्पीडिंग हे रस्ते अपघातांचे सर्वात मोठे कारण असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. याशिवाय बेदरकारपणे वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार आहेत.
हेल्मेट न घालता गाडी चालवणे सर्वात धोकादायक –
दुचाकी अपघातात 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू हेल्मेट नसल्यामुळे झाला आहे. बाईक चालवताना झालेल्या रस्ते अपघातात 35692 लोकांचा मृत्यू झाला. त्याचवेळी, हेल्मेटशिवाय दुचाकीवर बसल्याने 14,337 लोकांचा मृत्यू झाला.