पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवलंबले जाणार असून, शाळांमध्ये शैक्षणिकदृष्ट्या आमूलाग्र बदल होणार आहेत. नवीन धोरणात शिक्षकांची जबाबदारी वाढणार आहे, असे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) सहसंचालक डॉ. शोभा खंदारे यांनी सांगितले.
नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समूहाच्या माध्यमातून तयार केलेले शतक नावीन्यपूर्ण उपक्रमांचे या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. पुणे महापालिकेच्या उपप्रशासकीय अधिकारी शुभांगी चव्हाण, आबा बागूल, जयेश शेंडकर, विजया महाडिक, विशाल तांबे, सचिन डिंबळे, विकास काटे, देवराव चव्हाण आदी याप्रसंगी उपस्थित होते.
शैक्षणिक आकृतिबंध, परीक्षा पद्धती, अध्ययन प्रक्रिया, तसेच प्रगती पुस्तक या सर्वच बाबतीत विद्या प्राधिकरण स्तरावर आवश्यक ते काम चालू आहे. हा सर्व मसुदा शिक्षकांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होत असून, शिक्षकांनी या गोष्टी बघाव्यात व २०२७ पर्यंत पायाभूत साक्षरतेबाबत आवश्यक ते काम करावे, असे आवाहन डॉ. शोभा खंदारे यांनी केले.
या वेळी महाराष्टातील १०३ उपक्रमशील शिक्षकांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण पोटे, शीतल मदने, गणेश कामथे, संगीता म्हस्के, हेमलता चव्हाण, सोपान बंदावणे, जयश्री जायभाये, मनीषा बोर्डे, संगीता बागूल आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आयुब शेख यांनी केले. बळीराम जाधव यांनी आभार मानले.