कोयनानगर, (वार्ताहर) – पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून रविवारी पाटण येथे झालेल्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारची सुट्टी असूनही या जनता दरबारात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून तालुक्यात दरवर्षी जनता दरबार भरवला जात आहे. राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा शुभारंभ गतवर्षी पाटण तालुक्यात झाला होता. या अभियानाचा 56 लाख जनतेला लाभ झाला आहे. याच धर्तीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पाटण पंचायत समितीच्या प्रांगणात रविवारी जनता दरबार झाला.
देसाई म्हणाले, जनता दरबार व ‘शासन आपल्या दारी’ या लोकाभिमुख उपक्रमांमुळे शासकीय योजनांपासून वंचित राहिलेल्या व्यक्तींना लाभ मिळून, त्या विकासाच्या प्रवाहात येत आहेत. हा कार्यक्रम दौलतनगर (मरळी), ता. पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकात घेतला असता, तर या चांगल्या उपक्रमाला विरोधी गटाने नावे ठेवली असती. त्यामुळे हा उपक्रम पंचायत समितीच्या प्रांगणात घेतला. तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून, त्यासाठी निधीची अडचण भरणार नाही.
जितेंद्र डुडी म्हणाले, तालुक्यातील जनतेच्या प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा होण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई हे दरवर्षी जनता दरबाराचे आयोजन करतात. यामध्ये आलेल्या अर्जांवर दोन महिन्यांत निर्णय घेऊन, प्रश्न सोडवण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
यावेळी उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार अनंत गुरव, गटविकास अधिकारी गोरख शेलार आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.