पुणे – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे जीवन संघर्ष आणि समाजकार्याची गाथा आहे. आजही पुरुषांचे वर्चस्व असलेल्या राजकारणात त्यांनी आपल्या समाज कार्याने कायमचा ठसा उमटविला आहे. त्यांचा जीवनप्रवास राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या महिलांकरिता सदैव मार्गदर्शक आणि प्रेरणादायी राहील, असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले.
विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या “एैस पैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, लेखिका करुणा गोखले उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, भारतीय महिला सर्व क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आपला ठसा उमटवत आहेत. महाराष्ट्र यामध्ये नेहमीच कायम आघाडीवर राहिला आहे. सामान्य कार्यकर्ती ते उपसभापती असा डॉ. नीलम गोऱ्हे यांचा प्रदीर्घ जीवन प्रवास असून, या पुस्तकातून सामाजिक कार्यकर्ती ते राजकीय नेता या प्रवासाची कहाणी शब्दबद्ध करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागातील महिलांसाठी नीलमताईंचे सामजिक कार्य कायमच सुरू असते. या पुस्तकातून त्यांचे राजकारणापलीकडचे समाजकारण नव्या पिढीला कळेल.देशात महिला धोरण आणणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. त्यामध्ये त्यांनी चांगल्या सूचना आणि पाठपुरावा केलेला आहे. शिवसेनेच्या इतिहासातली पहिली महिला शिवसेना नेता असोन, महिला आरक्षण विषय, मराठवाडा विद्यापीठ नामांतर यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, सामाजिक आणि राजकीय कार्य करत असताना वेळ खूप महत्त्वाची असते. वेळ देणे, घेणे आणि ती ठरलेली वेळ पाळणे ही मोठी कसरत असते. परंतु लेखिका करुणा गोखले यांनी या पुस्तकांसाठी खुप मेहनत घेऊन वेळेचे नियोजन केले आणि या पुस्तकाचा प्रवास पूर्ण केला. कोणतेही कार्य आपण सांगितले नाही तर ते कळणार नाही सामजिक दायित्व म्हणून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.