शशिदा ईनामदार
अमृत महोत्सव, सहस्रचंद्रदर्शनानंतरच्या आजच्या “जीवन गौरव पुरस्काराने नमंच्या लौकिकात भरच पडली आहे. 11 जानेवारीला त्यांचा 85वा वाढदिवस साजरा होताना डॉ. न. म. जोशींचा हात सदैव लिहिता राहावा.
अमरेंद्र भास्कर-मराठी बालकुमार-साहित्य संस्थेचा यंदाचा “जीवन गौरव पुरस्कार’ शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यक्षेत्रात गेली पाच दशके स्वतःची नाममुद्रा उमटवणारे आमचे “नूमवी’तील पहिले ज्येष्ठ सहकारी शिक्षक मित्र. डॉ. न. म. ना वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचे हस्ते प्रदान होत आहे, हा आमच्यासाठी मणिकांचन सुवर्णयोगच आहे. एक अध्यापक, प्राध्यापक, डॉक्टरेट, शिक्षणतज्ज्ञ असा नमंचा प्रवास थक्क करणारा आहे. आजचा हा सन्मान आम्हा सर्व नूमवीयांसाठी आनंददायी, अभिमानास्पद आहे.
1968 साली मी नूमवीत अध्यापक म्हणून रूजू होण्यापासून आजवरच्या माझ्या वाटचालीत आणि यशात नमंचा मोठा वाटा आहे. अशा अफलातून मित्राची मला उमगलेली जीवनकथा अत्यंत हृदयस्पर्शी आहे. पण त्याची खंत त्यांनी कधी कुणापाशीही केली नाही. उलट हसतमुखाने प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकदृष्टीने ते आजवर पाहत आले, हेच त्यांच्या यशाचे गमक म्हणावे लागेल.
नमंचे पूर्ण नाव नरसिंह महादेव जोशी. त्यांचा जन्म 11 जानेवारी 1936 रोजी पुण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव अन्नपूर्णा, त्या नर्सिंग व्यवसायात तर वडील निष्णात पाककला आचारी. संसाराचा गाडा चालविण्यासाठी काबाडकष्ट करणारे हे मध्यमवर्गीय दाम्पत्य मूळचे सातारा जिल्हातील पाटण तालुक्यातील गारवडे या निसर्गरम्य खेडेगावचे. घरात वडिलोपार्जित श्रीराम मंदिर. रोज देवपूजा. कथाकीर्तनाच्या संस्कारात न. म. आजोळी वाढले. इ. 4 थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. इ. 5वी, 6वी, 7वीपर्यंत ते सोलापुरात मावशीकडे राहिले. इ. 8वीसाठी जळगावला तर 9वीसाठी सांगलीतील सिटी स्कूल अशी त्यांची फरफट झाली. महाराष्ट्रभर भ्रमंती करीत इ. 10वी, 11वीसाठी ते पुण्यातील भावे स्कूलमध्ये दाखल झाले. पुढे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
हजारो सुखदुःखाची, अनुभवाची “शिदोरी’ हाच त्यांच्या लेखनाचा पाया झाला. 13 वर्षे त्यांनी नूमवीत नोकरी केली. टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये प्राध्यापक म्हणून बढती मिळाली. ते डॉक्टरेट झाले. त्यांनी लेखनाला प्राधान्य दिले. 1951 साली मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या “विविधवृत्त’मध्ये त्यांचा पहिला विनोद प्रसिद्ध झाला. त्यास 2 रूपये मानधन मिळाल्याची आठवण आजही त्यांना आहे. य. गो. जोशींच्या “प्रसाद’ मासिकातील “अवशेष’ ही त्यांची कथा विशेष गाजली.
1962 साली संत बसवेश्वर चरित्राला प्रसिद्धी मिळाली. कर्नाटकातील मराठी पाठ्यपुस्तकात त्यांचा धडा होता. 1978 साली आग्रा येथील केंद्रीय हिंदी संस्थानच्या वार्षिक अंकात “सत्कार’ ही त्यांची सर्वोत्कृष्ट मराठी कथा म्हणून छापली गेली. पुढे स्वराज्य या दिवाळी अंकातून त्यांच्या लघुकथांना प्रसिद्धी मिळाली. म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, निःस्पृह रामशास्त्री ही त्यांची चरित्रात्मक पुस्तके विशेष गाजली. आजवर त्यांच्या नावावर 65 पुस्तके आहेत.
एवढ्या उदंड साहित्यसंपदेचे ते मानकरी आहेत. नाटक-एकांकिका हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय. “डॉक्टर, योगी आणि यम’ ही त्यांची रंगभूमीवर गाजलेली नाटिका. तिने तीन हजार प्रयोगांचा उच्चांक गाठला. असा हा लेखनात सदैव रमलेला आमचा मित्र!
2003 साली निगडी येथे पार पडलेल्या कुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले. त्याचवेळी प्रा. रा. ग. जाधव अखिल भारतीय संमेलनाचे अध्यक्ष झाले. हा पुणेकरांसाठी प्रथमच सुवर्णयोग ठरला. त्यामुळे या दोघांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. मसापचे कार्यवाह म्हणूनही त्यांनी काम केले आहे. उत्तम वक्ते म्हणून महाराष्ट्रभर त्यांनी व्याख्याने देऊन श्रोत्यांची मने जिंकली. त्यांनी पीएच.डी.चे गाइड म्हणूनही काम पाहिले.
“कट्ट्यावरील गप्पीस्ट माणूस’ ही नमंची वेगळी ओळख आहे. न. म. कुणालाही हसतंबोलतं करतात, स्वतःही त्यात रममाण होतात, ही माणसं जोडण्याची एक कला आहे. एकदा गप्पांच्या ओघात नमंनी बालपणातील एक मजेशीर अनुभव कथन केला. ते म्हणाले, “माझ्या गारवाडे गावाजवळील मारूल गावात विठाबाई नारायणगावकर यांचा लोकप्रिय तमाशाचा फड उभारला होता. तेव्हा ब्राह्मण कुटुंबात तमाशाला जायला सक्त बंदी होती. आजोबा तर कडक शिस्तीचे. त्यांची नजर चुकवून केवळ उत्सुकतेपोटी न. म. तमाशाच्या तंबूतील गर्दीत घुसून पुढेच जाऊन बसले. शृंगाराची फक्कड लावणी बाईंनी पेश केली. त्यात “प्रियकराचे करकचून चुंबन घेणारी प्रेयसी’ असा एक संदर्भ आला.
प्रेक्षकांतील एका महाभागाने विठाबाईंना चॅलेंज दिले की, “इथं कुणाही पुरुषाचा मुका घेऊन दावा, माझं दहा रुपये तुम्हाला बक्षीस हाय!’ विठाबाईंनी त्याचा हेतू ओळखला. त्या चांगल्या खमक्या निघाल्या. चबुतऱ्यावरून खाली येऊन सर्वांकडे तिरपा कटाक्ष फिरवीत समोरच बसलेल्या चिमुरड्या नमंना त्यांनी हेरले अन् क्षणार्धात मुका घेतला. हा सारा प्रकार पाहून तो माणूस खजील झाला. त्याने मुकाट्याने दहा रुपयांची नाणी विठाबाईंना दिली. पुढे तीस वर्षांनी विठाबाईंचा तमाशा पुण्यात मुक्कामाला आला तेव्हा न. म. त्यांना भेटावयास गेले आणि त्यांना हा किस्सा सांगितला. तेव्हा त्या मनापासून हसल्या.
आजवर शिक्षणरत्न पुरस्कार, स्नेहांजली पुस्काराने न. म. सन्मानीत झाले आहेत. एका समारंभात सिम्बायोसिसचे डॉ. मुजुमदार म्हणाले, “पुण्यनगरीत आपल्या अद्याक्षराने ओळखले जाणारे दोन जोशी- आपले एस. एम. आणि दुसरे न. म.