सातारा -करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आजपासून इतर सर्व प्रकारची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. असे असले तरी करोनाच्या संकटाची तीव्रता आजही कायम आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी आणि गरज असल्याशिवाय कोणीही विनाकारण घराबाहेर फिरू नये आणि करोना वाढीला निमंत्रण देऊ नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
किराणा माल, भाजीपाला, दूध, मेडिकल ही अत्यावश्यक दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने गेले दोन- अडीच महिने बंद ठेवण्यात आली होती. अनेक दिवस दुकाने बंद राहिल्याने दुकानामध्ये काम करणारे कामगार, कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. दुकानदार आणि व्यावसायिकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. दुकाने बंद असल्याने दैनंदिन वापरातील वस्तू, कपडे आदी साहित्य मिळत नसल्याने नागरिकांचीही मोठी गैरसोय होत होती.
त्यामुळे कापड दुकाने, इलक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, हार्डवेअर, मोबाईल, कटलरी आदी इतर सर्व प्रकारची दुकाने करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे निर्बंध घालून सुरु करण्यास परवानगी द्यावी, याबाबतचा पाठपुरावा शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा प्रशासनासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि मुख्य सचिवांकडे केला होता. त्यांच्या मागणीनुसार जिल्हा प्रशासनाने कन्टेन्मेंट झोन वगळून इतर सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले गेले असून दुकानदार, व्यावसायिक आणि नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. असे असले तरी दुकाने उघडली म्हणून विनाकारण कोणीही बाहेर फिरू नये, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी जनतेला केले आहे.