सातारा – शहरातील स्वच्छतेचे गुणगान गाणाऱ्या सातारा जिल्हयातील एकमेव “अ’ वर्ग सातारा नगरपालिकेला कचरामुक्तीचा तीन तारांकित दर्जा राखता आला नाही. सोनगाव कचरा डेपोच्या तांत्रिक त्रुटींमुळे सातारा पालिका या स्पर्धेतून बाहेर पडली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत मोहिमेअंर्तगत दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणासाठी देशातील मोठ्या व मध्यम लोकसंख्येच्या कचरामुक्त शहरांची स्पर्धा घेतली जाते. यामध्ये फाईव्ह, थ्री व वन स्टार मानांकनाचा समावेश करण्यात आला होता. देशातील 1400 पैकी महानगरपालिका व पालिका क्षेत्रातील 141 शहरांनाच हे मानांकन प्राप्त झाले होते. सातारा जिल्ह्यातील कराड,महाबळेश्वर, मलकापूर या तीन नगरपालिकांनी कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकन प्राप्त केले. मात्र, जिल्हयातील एकमेव “अ’ वर्ग सातारा पालिका या मानांकनास प्राप्त करण्यात अपयशी ठरली.
कचरामुक्त शहरांसाठी या मानांकनात मिळालेल्या गुणांकनाचा परिणाम स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या मूळ निकालावर होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सातारा पालिकेचे देशपातळीवरील मानांकन घसरण्याची शक्यता आहे. सोनगाव कचरा डेपोतील सुविधांची उपलब्धता या तांत्रिक निकषाची परिपूर्ती पालिकेने केली. घनकचरा व्यवस्थापनाच्या तयारीतही गुणांकन मिळवले. मात्र, व्यवस्थापन व विलगीकरण आदी तांत्रिक मुद्यांवर काहीच काम न झाल्याच्या त्रुटीचा फटका सातारा पालिकेला बसला आहे. केंद्रीय समितीचे पथक सातारा शहराच्या दौऱ्यावर आले होते. त्यातील अतुल सलगरे यांनी सोनगाव कचरा डेपोची पाहणी केली होती. तांत्रिक परिभाषेत “ऑपरेटिव्ह डेस्क टॉप’चा निकष पास केला तरी “गार्बेज मॅनेजमेंट’च्या मुद्यावर सातारा पालिका मात्र सपशेल तोंडघशी पडली. कचरामुक्त शहरासाठीच्या सर्व निकषानुसार सातारा पालिकेने थ्री स्टार मानांकनासाठी प्रस्ताव पाठवला होता. मात्र, केंद्रीय समितीचे काही निकष खूपच कठीण होते. त्यामुळे सातारा पालिकेचा समावेश या मानांकनात होऊ शकला नाही, अशी माहिती पालिकेचे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी दिली.
नगरसेवक अनभिज्ञच
कोणत्याही उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी लोकसहभाग व व्यापक नियोजनाची आवश्यकता असते. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात प्रशासनाने नगरसेवकांनाच अनभिज्ञ ठेवल्याचा आरोप आहे. आरोग्य निरिक्षकांनी निष्क्रिय व कागदी घोडे नाचवल्याचे काम केल्याचा संदेश या थ्री स्टार मानांकनाच्या निमित्ताने गेला आहे. मात्र हे कटू सत्य मात्र स्वीकारायला कोणी तयार नाही.