नगर -केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी 15 ऑगस्टपर्यंत शाळा, कॉलेज सुरू करू नयेत, असे म्हटले आहे. शिक्षण तज्ज्ञांसोबतच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शाळा, कॉलेज सुरू करण्याची घाई न करता ऑनलाईन, टीव्ही किंवा अन्य पर्याय शोधवा, असे शिक्षक भारतीच्या वतीने मागणी करण्यात आली. तसे निवेदन आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी मुख्यमंत्र्याना दिले, अशी माहिती शिक्षक नेते तथा राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी सांगीतले.
यावेळी शिक्षक भारतीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात तूर्त 15 ऑगस्ट पर्यंत शाळा, कॉलेज सुरू करू नयेत. ऑनलाईन, टिव्ही, सोशल, प्रिंट मीडिया या माध्यमांचा वापर सुरू करावा. दूरस्थ शिक्षणासाठी सर्व शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण द्यावे. इ. 1 ली ते इ.12 वी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके घरपोच द्यावीत. पुस्तके देताना अनुदानित, विनाअनुदानित, टप्पा अनुदानित किंवा अंशतः अनुदानित असा कोणताही फरक करू नये.
अनुदान, विनाअनुदान, टप्पा, अंशतः अनुदान हे धोरण विद्यार्थ्यांसाठी नाही., सर्व आश्रमशाळा, स्पेशल स्कुल, रात्रशाळा यांनाही मोफत पुस्तके द्यावीत., राज्यातील 70 टक्के शिक्षक अजुनही करोना ड्युटीवर आहेत. त्यांना 15 जूनपासून परत बोलवावे. 15 जून ते 30 जून सर्व शिक्षकांना सक्तीचे होम क्वॉरंटाईन करण्यात यावे. करोना ड्युटी केलेल्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांची बदली रजा सेवा पुस्तिकेत अर्जित रजा म्हणून नोंद करावी. आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्याची माहिती गाडगे, आप्पासाहेब जगताप, विजय कराळे, बाबासाहेब लोंढे आदींनी केली आहे.