नवी दिल्ली – पुरवठ्याच्या परिस्थितीत फारसा फरक पडला नसला तरी सध्या खाद्य तेलाचे दर वाढत आहेत. खाद्यतेल उत्पादकांनी सध्याच्या परिस्थितीत दर वाढवू नयेत असे आवाहन खाद्यतेल उत्पादक संघटनेचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी केले आहे.
चतुर्वेदी यांनी या संघटनेच्या सदस्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अगोदरच खाद्य तेलाचे दर जागतिक पातळीवर जास्त असताना रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यामुळे परिस्थिती आणखी अस्थिर झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये उत्पादकांनी खाद्य तेलाचे दर आवश्यकतेपेक्षा जास्त वाढवू नयेत.
सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकारने खाद्यतेलाच्या साठयासंदर्भात जे नियम लागू केले आहेत त्या नियमाची सदस्यांनी काटेकोर अंमलबजावणी करावी. खाद्यतेलाच्या साठेबाजीचा प्रयत्न कोणीही करू नये असे आवाहनही या पत्रात करण्यात आले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतीने देशांमध्ये खाद्य तेलाचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. खाद्यतेल उत्पादक संघटना केंद्र सरकारच्या संपर्कात आहे असे त्यांनी सांगितले.