Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) प्रयत्न करत आहे. यासाठी त्यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची डेडलाइन देण्यात आली आहे. यातच आता गिरीश महाजन यांनी मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नसल्याचे विधान केले आहे. त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र गिरीश महाजन यांच्या या विधानाला मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. तसेच विनाकारण मराठ्यांना नडू नका, अन्यथा त्यांच्या आश्वासनाच्या क्लिप राज्यभर व्हायरल करू, असा इशाराही जरांगेंनी महाजनांना दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याने भरकटल्यासारखी वक्तव्ये करू नये. विनाकारण मराठ्यांना नडू नका, अन्यथा त्यांच्या आश्वासनाच्या क्लिप राज्यभर व्हायरल करू.गिरीश महाजनांनी विचार करून वक्तव्ये करावी. त्यांनी आपल्या मागणी पूर्ण करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर त्यांना आपण वेळ दिला होता. आमच्याकडे त्यांनी दिलेल्या आश्वासनाचे अनेक पुरावे आहेत. चुकीची वक्तव्ये करून समाजाची दिशाभूल करू नका. अन्यथा आम्ही त्यांच्या आश्वासनाच्या क्लिप राज्यभर व्हायरल करु,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
पुढे ते म्हणाले, “राज्यभरातून17 डिसेंबरला सर्व मराठा अंतरवाली सराटे येथे येणार आहे. सरकारला अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवावा अशी विनंती करणार आहे. तसेच मराठा आंदोलक बांधवांवरील अजूनही गुन्हे मागे घेतले नाहीत. सरकरने सांगितलं होतं की गुन्हे दाखल करणार नाही तरी देखील गुन्हे दाखल करून लोकांना अटक करण्यात येत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालवेत. हे थांबवा नाहीतर तुम्हाला जड जाईल,” असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
काय म्हणाले होते गिरीश महाजन?
“मनोज जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते. तेव्हा मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणं शक्य नाही, हे मी त्यावेळीच स्टेजवरून सांगितले होते. तसेच, ज्या लोकांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत, त्यांची तपासणी करून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकार घेईल. जेवढ्या लोकांच्या नोंदी सापडल्या आहे, त्यांना सरकार कुणबीचा दाखला देत आहे.”