पिंपरी – आयटी पार्क, हिंजवडीमधील टाटा टेक्नोलॉजी या कंपनीसमोर नॅशनल इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (नॅसेन्ट) च्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नॅसेन्टचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या वाईट काळात आम्हाला बेरोजगार करु नका, आम्हाला परत घ्या अशा आशयाचे फलक हाती घेतले होते. नॅसेन्ट इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (नॅसेन्ट)चे अध्यक्ष हरप्रीत सलूजा यांनी सांगितले की, कंपनीने 800 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. याविरोधात कामगार आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.
हरप्रीत सलूजा यांनी दैनिक प्रभात शी बोलताना सांगितले की, कोविड – 19 अंतर्गत व्यवसायातील नफा कायम राखण्यासाठी नोकरीवरुन काढून टाकल्याच्या तक्रारी एनआयटीईएसला प्राप्त झाल्या आहेत. कंपनीने यापूर्वी 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना बेंचवर ठेवले होते. या सर्व कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत विनावेतन रजेवर पाठविण्यात आले होते.
मागील आठ महिन्यांपासून कंपनीने या कर्मचाऱ्यांना वेतन दिलेले नाही. 1 मार्च 2021 रोजी सुरू झालेल्या बेकायदेशीर कृत्यामुळे आता 800 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. 31 मार्च 2020 रोजी जारी केलेल्या राज्य सरकारच्या निर्देशांचे, नियमांचे आणि इतर वैधानिक कामगार कायद्यांचे कंपनी व्यवस्थापाने उल्लंघन केले आहे.
सलूजा म्हणाले की, या घटनेमुळे आयटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे भविष्य धोक्यात आले आहे. बहुतांश कर्मचारी कठीण परिस्थितीला सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत ते काम करीत आहेत. या कामगारांचा रोजगार हिरावणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी आणि कर्मचाऱ्याना थकीत वेतन देण्याची मागणी केली आहे.
याबाबत कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख अनुपाल बॅनर्जी यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा मोबाइल आऊट ऑफ कव्हरेज एरिया असल्याने कंपनीची प्रतिक्रिया समजू शकली नाही.