सातारा – मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात का? मराठा समाजातील लाखो तरुण निराशेच्या गर्तेत आहेत. आरक्षणाचा प्रश्न आता सुटला नाही तर तो कधीच सुटू शकत नाही याची जाणीव मराठा समाजातील तरुणांना झाली असून सरकारने गांभीर्याने घेतले नाही तर मराठा समाजातील तरुण वेगळे पाऊल उचलू शकतात. आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या अन्यथा विष पिऊन मरू द्या, असा गर्भित इशारा छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज व मराठा आरक्षण चळवळीचे मुख्य प्रवर्तक खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
या संदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात खा. श्री. छ. उदयनराजे यांनी म्हटले आहे, महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाचा फक्त मतांसाठी वापर करणार्यांनी शेकडो वर्षे या समाजाच्या प्रश्नांना झुलवत ठेवले आहे. मराठा समाजातील तरुणांना गृहीत धरून सत्तेवर बसणार्यांनी आरक्षणाचा प्रश्न लोंबकळत ठेवला. इतर समाजांना आरक्षण देताना गांभीर्याने विधाने करणारे व कायदेशीर बाजू पुरेपूर लावून धरणारे सत्ताधारी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये मात्र मेखा मारून बसले आहेत. अलीकडे होत असणार्या बैठकांमध्येही मला फारसे गांभीर्य दिसत नाही, असे खा. उदयनराजे यांनी म्हटले आहे.