ग्वाल्हेर unemployment in India – भारतात सध्या बांगलादेश आणि भूतान पेक्षाही बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते आज येथील भारत जोडो न्याय यात्रेच्या मध्य प्रदेश टप्प्यातील सभेत बोलत होते. ते म्हणाले की, देशात बांगलादेश आणि भूतानपेक्षा बेरोजगार तरुणांची संख्या अधिक आहे. कारण दहा वर्षांच्या कालावधीत अनेक छोटे व्यवसाय संपवले आहेत.
देशात गेल्या ४० वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी आज आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारतातील बेरोजगारी दुप्पट आहे. आपल्याकडे बांगलादेश आणि भूतानपेक्षा जास्त बेरोजगार तरुण आहेत. कारण मोदी सरकारने नोटाबंदी आणि जीएसटी लागू करून छोटे उद्योग संपवले आहेत. जागतिक बँकेच्या अहवालात असे नमूद केले आहे की, २०२२मध्ये भारतातील तरुण बेरोजगारीचा दर २३.२२ टक्के होता, जो त्याच्या शेजारी पाकिस्तान (११.३ टक्के) आणि बांगलादेश (१२.९ टक्के) पेक्षा अधिक आहे.
राहुल गांधी म्हणाले की, देशातील मागास लोकांची संख्या ५० टक्के, आदिवासी आठ टक्के आणि दलितांची संख्या १५ टक्के आहे. हे सर्व मिळून ७३ टक्के होतात. या ७३ टक्क्यांपैकी एकही व्यक्ती मोठ्या कंपन्यांमध्ये सापडणार नाही. मग मोदीजी म्हणतात की मी गरिबांसाठी काम करतो, मग ते नेमके करतात काय, असा सवाल त्यांनी केला.
नरेंद्र मोदीजी म्हणतात की देशात जात नाही. गरीब आणि श्रीमंत या दोनच जाती आहेत. तसे असेल तर तुम्ही स्वताला ओबीसी कसे म्हणवता? असा सवाल त्यांनी केला. ते घाबरले आहेत, कारण त्यांना या ७३ टक्के लोकांना देशाचे सत्य कळू नये असे वाटते, असे ते म्हणाले.
तत्पूर्वी, देशातील बेरोजगारीच्या अशा उच्च पातळीमागील कारण अधोरेखित करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीसारख्या आर्थिक धोरणांना जबाबदार धरले आणि वस्तू आणि सेवा कर हा रोजगार देणाऱ्या एमएसएमई क्षेत्राला मोठा धक्का असल्याचा दावा केला. भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी मध्य प्रदेशात दाखल होताच, राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंग दोतसरा यांनी त्यांचे मध्य प्रदेश समकक्ष जितेंद्र पटवारी यांना राष्ट्रध्वज सुपूर्द केला.