बारामती : सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी खस्ता खाल्ल्या, त्यांचा आदर्श ठेवा. विज्ञानाची कास धरून बुद्धीने चाला. स्त्री, पुरुष, जात- धर्म वंश-भेद हा भेदाभेदच नको. आपले कर्तव्य दाखवा. मनाने सशक्त असणारी व्यक्ती ही माणूस बनते. माणुसकी दाखवते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी केले.
विविध क्षेत्रातील नामवंतांची ओळख व्हावी, त्यांच्या कार्यातून युवकांनी प्रेरणा घेऊन भविष्य घडवावे, या हेतूने ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने परिवर्तन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. या व्याख्यानमालेचे 113 वे पुष्प गुंफण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार, महाराव यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. एम आर. निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय डॉ आश्लेषा मुंगी यांनी करून दिला. संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी संस्थेच्या प्रथेप्रमाणे रोप देऊन पाहुण्यांचे स्वागत केले.
महाराव म्हणाले की, महाराष्ट्रात अशिक्षित माणसांनी प्रचंड काम केले. जसे की, ताराबाई शिंदे, अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, नाना पाटील, आदींनी मोठ्या प्रमाणात सामाजिक प्रबोधन केले. आपण तर शिकलेलो आहोत. मग आपण असे विचार का करीत नाही.
यावेळी मानवी संसाधन व्यवस्थापक गार्गी दत्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, विश्वस्त सुनंदा पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
प्राचार्य डॉ. एस. व्ही. महामुनी, संस्थेचे समन्वयक प्रशांत तनपुरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. डॉ. एम. आर. निंबाळकर यांनी आभार मानले.
रुढी, परंपरांचा गुलाम होऊ नका
महाराव म्हणाले की, रुढी आणि परंपरांचा गुलाम होऊ नका, वाचनाने उत्तुंग बनवून त्यावर घाव घाला. माणसाचे बाह्यरंग हे महत्त्वाचं नसते. कपडे कुठले घातले आहेत, किती महागाचे आहेत, हे महत्त्वाचे नाही तर ती व्यक्ती आतून किती विचारांनी सकारात्मक खोल आहे, हे जेव्हा प्रत्येकाला कळेल, तेव्हा देश विकासाच्या मार्गाने वेगाने धावेल. शिक्षकांनी विद्यापीठाच्या नियमित अभ्यासक्रमापर्यंतच न जाता त्याच्या बाहेरचेही ज्ञान मुलांपर्यंत पोहोचवावे. दर मिनिटाला जग बदलत आहे, नवनवीन ज्ञान, संशोधन मुलांपर्यंत नेले पाहिजे. रूढी, परंपरा, बुवाबाजी आदीमध्ये गुंतत चाललेल्या समाजाला विज्ञानाची नवी दृष्टी देऊन खऱ्या अर्थाने प्रकाशमान करणे, ही काळाची गरज आहे.