लोणावळा – गेल्या पाच सहा वर्षात देशात व राज्यात अनेक राजकीय आणि सामाजिक घडामोडी झाल्या. या संक्रमण काळात भाजपा देशात व जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आला. त्यात महिला मोर्चाचे मोठे योगदान आहे. महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर पुरूष कार्यकर्त्यांपेक्षा अन्य अनेक विविध जबाबदाऱ्या असतात. त्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. महिलांपुढे जशी अनेक आव्हाने आहेत, तशा त्यांना अनेक संधी आहेत. उत्तम कामातून आपल्याला पुढे जायचे असते. कितीही आव्हाने पुढे आली तरी निराश होता कामा नये. जगात व देशात मानव संशोधनात महिलांचे 50 टक्के योगदान आहे. यामुळेच जगातील अनेक देशांची प्रगती झाली आहे. महिलांचे कार्य व क्षमतेचा उपयोग केल्यास देशाची प्रगती अटळ आहे, असे मत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चाच्या कार्यसमिती बैठकीच्या समारंभ प्रसंगी लोणावळ्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. या वेळी भाजपा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, खासदार रक्षा खडसे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, नीता केळकर, विद्या ठाकूर, माधवी नाईक, स्मीता वाघ, कांता नलावडे, प्रणिता चिखलीकर, अश्विनी जितकर, दीपाली मोकाशी, सविता कुलकर्णी, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, सायली बोत्रे, ज्योती जाधव व योगीता कोकरे उपस्थित होत्या.
या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांना उत्तरे देताना फडणवीस म्हणाले की, जगाच्या व देशाच्या मानगुटीवर करोनाचे संकट असतानाच बर्ड फ्लूचे संकट देशात व राज्यात झपाट्याने वाढत आहे. हे संकट गंभीर असून, याचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यावर लवकरच उपाय करण्याची गरज आहे. अगोदरच लॉकडाऊनमुळे कुकुटपालन करणाऱ्या व्यवसायिकांसह उद्योजकांची परिस्थिती खराब झाली आहे. त्यांना आर्थिक मदत केल्याशिवाय ते उभे राहू शकत नाही. जे जे सामाजिक प्रश्न आहे. ते त्याचवेळी मांडणे गरजेचे आहे. त्याशिवाय त्या प्रश्नांचा उलगडा होणार नाही, तसेच ते सुटणार नाही.
भंडारा येथील हॉस्पिटलच्या आगीत झालेल्या नवजात बालकांच्या प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, कोणत्याही घटनेसंदर्भात यापूर्वीचे सरकार किंवा केंद्र सरकार किती जबाबदार आहे. त्या गोष्टींचे सर्वांचे खापर त्यांच्यावर फोडायचा आणि आपण नामानिराळे व्हायचं हा एक नवीन फंडा या सरकारने केला सुरू आहे. मागील सरकारमध्ये पाचही वर्ष आरोग्यमंत्री शिवसेनेचा होता. मात्र असे जरी असले तरी, ते आमच्या सरकारचे होते. मे महिन्यामध्ये दीड कोटी रुपयांची मागणी ही भंडारा येथील हॉस्पिटलच्या अग्निशमन सुविधेसाठी केली होती. मात्र सहा महिने हे सरकार यावर कोणतीही कारवाई करू शकले नाही. बिल्डरांचे प्रश्न आले की, ते प्रश्न हे सरकार धावाधाव करून सोडविण्यात धन्यता मानते. मात्र साधे दीड कोटी रुपये या दवाखान्याला देवू शकले नाही. प्रत्येक गोष्ट केंद्र सरकार कशी टाकता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न हास्यास्पद व असंवेदनशील आहे, अशा असंवेदनशीलतेचे ऑडिट झाले पाहिजे.
तसेच या प्रकरणी अद्यापही कारवाई झाली नाही. त्या ठिकाणी मुख्यमंत्री जाऊन आल्याने आम्हाला वाटले कारवाई होईल, तसेच पीडितांना व त्यांच्या कुटुंबांना वाढीव मदत मिळेल, अशी आमची अपेक्षा होती. मात्र असे कोठेही होताना दिसत नाही, असे अत्यंत असंवेदनशील सरकार व टोलवाटोलवी करणारे हे सरकार असल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, दिल्लीचे आंदोलन पाहिले, तर यामध्ये साधारणता डावे लोकच सध्या नेतृत्व करत असून, त्यात वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. यापूर्वी आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी होते. मात्र आता तेही परत निघून गेले आहे. कारण त्यांच्याही लक्षात आले आहे की, केंद्र सरकार सगळ्या मागण्या मान्य करत असताना केवळ याठिकाणी आंदोलन चाललेच पाहिजे, या हेतूने काही लोक आंदोलन चालविण्याचा प्रयत्न करत आहे. मला विश्वास आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून भूमिका घेत शेतकऱ्यांशी सुसंवाद साधत आहे. परंतु जे काय नेते ज्या ठिकाणी बैठका याला राजकीय रंग व चेहरा देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा फारसा फरक पडणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.
या वेळी महिला मोर्चाच्या कार्यसमितीच्या बैठकीत भाजपचे प्रवक्तेमाधव भंडारी, केशव उपाध्ये व विजया रहाटकर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.