अतुल देशमुख यांच्या प्रचारार्थ अंधेरीतील मतदारांशी संवाद
राजगुरूनगर – खेड तालुक्याच्या नेतृत्वाचे तरुणांकडे, बेरोजगाराकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रश्न सोडविण्यासाठी आमदार सर्वांना एकत्र आणू शकतात; मात्र दुर्दैवाने ही ताकद दुसरीकडे वापरली जात आहे. आम्हाला संधी नसल्याने आमच्या भागाचा विकास झाला नाही म्हणून आम्हाला “मालक नको, सेवक आमदार हवा’ आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी केले.
खेड तालुक्यातील सुमारे सहा हजार कुटुंब सातबंगला, अंधेरी (मुंबई) येथे कामानिमित्त स्थायिक झालेले असून ते खेड-आळंदी मतदारसंघाचे मतदार असल्याने त्यांच्याशी अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांनी संवाद साधत सभा घेतली. त्या सभेत बुट्टे पाटील बोलत होते. यावेळी तालुक्यातील नेत्यांसह मोठ्या संख्येने तालुक्यातील मुंबईस्थित नागरिक उपस्थित होते.
शरद बुट्टे पाटील म्हणाले, खेड तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित असताना दुर्दैवाने आजी माजी-आमदारांची शक्ती एकमेकांवर सूड उगवण्यासाठी वाया चालली असल्याने तालुक्याच्या विकासाला खीळ बसली आहे.
व्यक्तिगत जीवनावर बोलण्यात त्यांची स्पर्धा आहे. तालुक्यातील विकासाबाबत त्यांची स्पर्धा नाही. म्हणून आता अतुल देशमुख यांच्या रूपाने संधी चालून आली आहे. विकास करणाऱ्या देशमुखांमागे भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तरी देशमुख यांना आपल्या आशीर्वादासहित मताधिक्य द्यावेत. तसेच खेड तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी संधी द्यावी, असे आवाहनही यावेळी शरद बुट्टे पाटील यांनी केले. यावेळी अमोल पवार, देविदास बांदल, बाळासाहेब शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले.
खेड तालुक्यात तीन धरणे; मात्र पाणी दुसरीकडे जात आहे. पाण्याचे नियोजन नसल्याने विकास नाही. विकासाकडे जाणारा उमेदवार हवा की, खड्ड्यात नेणारा आमदार हवा आहे? “मुक्या’चे “सोंग’ घेऊन तालुक्यातील जनतेची फसवणूक केली जात आहे. हे आता थांबवायचे आहे, यासाठी तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. पश्चिम भागाचा स्वाभिमान टिकविण्यासाठी ही लढाई आहे. त्यासाठी “तुम्ही मला साथ द्या’.
-अतुल देशमुख, अपक्ष उमेदवार, खेड-आळंदी मतदारसंघ