पुणे – सत्तेत असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी पोलीस स्टेशनमध्ये जावून गोळीबार केल्याची घटना अत्यंत गंभीर आणि निंदनीय अशी आहे. सरकारला महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे का?, असा सवाल काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला. उल्हासनगर येथे पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार धंगेकर बोलत होते.
ते म्हणाले, सत्ताधारी नेत्यांमध्ये टोकाची भांडणे, टोकाचे वाद आहेत. हे माध्यमांमध्ये याआधीच प्रसिद्ध झाले आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण महाराष्ट्राला या घटनेच्या माध्यमातून पहायला मिळाले. पण, हे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणाला काळिमा फासणारे आहे. पोलिसांसमोर असे कृत्य घडत असतील तर या राज्यात कायदा सुव्यवस्था कितपत शिल्लक आहे? हे कळते. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढत आहे. वातावरण बिघडत आहे. पण, सरकार शांत आहे. म्हणून मला विचाराचे आहे की सरकारला महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे का?