सरसंघचालक मोहन भागवत : गीता महोत्सवात केले मार्गदर्शन
संगमनेर (प्रतिनिधी) – गीतेच्या संस्कारामुळे भारत विश्वगुरू बनेल. गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कर्म करीत रहा. फळाची अपेक्षा करू नका, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर गीता जयंती व गीता परिवाराचे संस्थापक स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या 71 व्या जन्मदिनाचे निमित्त साधून गीता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भागवत बोलत होते. व्यासपीठावर योगगुरू रामदेव बाबा, गोविंददेवगिरीजी महाराज, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, गीता परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उद्योजक राजेश मालपाणी, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हजारोंच्या संख्येने बाळगोपाळांनी हजेरी लावली.
भागवत म्हणाले, अत्यंत मनापासून हा गीता महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याठिकाणी आलेल्या सर्वांनी उपदेश ऐकले. मात्र नुसते ऐकून न घेता त्याचे अनुकरणही करणे गरजेचे आहे. ऐकलेल्या सर्व गोष्टी आपण सनातन काळापासून ऐकत आलो आहेत. तसेच विविध ग्रंथही वाचले आहेत. मात्र त्याचे काही जण अनुकरण करतात व काही करत नाहीत. मात्र हे सर्व स्वत: मध्ये अवगत करण्यासाठी आपल्यालाच आपली बाधा निर्माण होत असते. सध्या अनेक जाहिराती विविध ठिकाणी बघायला मिळतात आणि त्या जाहिरातींवर विश्वास ठेवून आपण ती वस्तू घेतो. मात्र ही वस्तू खरी आहे की खोटी आहे, त्याची आपण शहानिशा करत नाही. आपण आपले आत्मपरीक्षण करावे. छोट्या-छोट्या कारणामुळे आपले कर्तव्य सोडून देतो. त्यामुळे कर्तव्याकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. ऐवढे केले म्हणजेच गीतेचे अनुकरण केल्यासारखे आहे, असे ते यावेळी म्हणाले.