सहकारनगर, दि. 21 – पावसाने शहरातील रस्त्यांची अक्षरक्ष: चाळण होऊन रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. तरीही शहरातील 98 टक्के खड्डे बुजविल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांत 11 हजार 706 पैकी 11 हजार 418 खड्डे बुजविण्यात आले असून, शहरात केवळ 288 खड्डे असल्याचा दावा पथ विभागाकडून करण्यात आला आहे. पालिकेचा हा कारभार अजब आणि पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे उपनगर अध्यक्ष जयराज लांडगे यांनी केला आहे.
समान पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण आणि पथ विभागाने एकाच कामांसाठी वारंवार केलेल्या खोदाईमुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याची वस्तुस्थिती आहे. जुलै महिन्यातील पहिल्याच जोरदार पावसाने अनेक रस्त्यांची चाळण झाल्याचे पुढे आले. वर्षभरापासून सुरू असलेली कामे रखडल्याने पावसाळ्यातील जुलै महिन्यात भरपावसात शहराच्या विविध भागांत रस्ते खोदाई आणि रस्त्यांची कामे सुरू राहिली. त्यामुळे महापालिकेला रस्ते दुरुस्ती करण्यास पुरेसा वेळच मिळाला नाही. त्यातच पावसातच महापालिकेच्या पथ विभागाकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात आली.
मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने रस्ते दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतला. मात्र, ही कामेही निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाला पुन्हा सुरूवात झाल्यानंतर शहर आणि उपनगरात रस्ते पूर्ववत केलेल्या कामांची पोलखोल झाली.
अनेक रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले असून वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यांबाबत महापालिकेच्या तक्रार निवारण केंद्राकडे शेकडो तक्रारी येत असतानाही महापालिकेने 98 टक्के खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. रस्ते दुरुस्तीसाठी विशेषत: खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने आत्तापर्यंत अडीच कोटींचा खर्च केला आहे. तरीही खड्डे कायम आहेत. हा पुणेकरांच्या पैशांचा अपहार आहे. पालिकने तत्काळ खड्डे बुजवावेत. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणीही जयराज लांडगे यांनी केली आहे.