चेन्नई – तामीळनाडू विधानसभेत सोमवारी अभूतपूर्व नाट्य घडले. द्रमुकच्या नेतृत्वाखालील सरकार आणि राज्यपाल आर.एन.रवी यांच्यातील (Governor R N Ravi) संघर्षाचा नवा अंक थेट सभागृहात पाहावयास मिळाला. राज्यपालांनी अभिभाषणात काही संदर्भ टाळल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. त्यातून सुरू झालेल्या गदारोळातच रवी यांनी विधानसभेतून वॉकआऊट केले.
तामीळनाडू विधानसभेच्या नववर्षातील पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभी राज्यपाल रवी यांचे अभिभाषण झाले. राज्य सरकारकडून तयार करण्यात आलेल्या त्या अभिभाषणातील काही भागांचा उल्लेख रवी यांनी केला नाही. त्यांनी काही महान व्यक्तींचा नामोल्लेख टाळला. त्यामुळे प्रारंभापासूनच रवी यांच्या अभिभाषणात घोषणाबाजी करून अडथळे आणू पाहणारे सत्ताधारी सदस्य आणखी आक्रमक झाले. मात्र, विचलित न होता रवी यांनी अभिभाषण सुरूच ठेवले.
ते समाप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी एक ठराव मांडला. रवी यांचे अभिभाषण प्रथेला सोडून होते. त्यामुळे विधानसभेत सादर करण्यात आलेला अभिभाषणाचा मूळ मसुदा स्वीकारण्यात यावा, अशी भूमिका त्या ठरावातून मांडण्यात आली.
Karnataka : कॉंग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्यावरील ‘त्या’ पुस्तकाला Congressचा जोरदार आक्षेप
स्टॅलिन बोलत असतानाच रवी जागेवरून उठले आणि विधानसभेतून बाहेर पडले. विधानसभेतील त्या नाट्यामुळे तामीळनाडूतील राजकारण तापले आहे. त्यातून सोशल मीडियावरूनही वाद रंगला आहे.