करोनाचा परिणाम : सामाजिक कार्यकर्ते, दानशुरांचे आखडते हात
कामशेत – निसर्ग चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, करोनामुळे ठप्प झालेले आर्थिक चक्र या सर्वांच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी फारशी “गोड’ झाली नसल्याचे चित्र मावळ तालुक्यात आहे. आर्थिक घडी बसलेली नसल्याने अनेक दानशूरांनी यावेळी फराळ वाटप, भेटवस्तू देणे याकडे आखडता हात घेतल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम व गोरगरिबांची यावर्षी दिवाळी साध्या पद्धतीतच साजरी झाली.
पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांच्या मध्यवर्ती ठिकाण अशी भौगोलिक परिस्थिती असलेल्या आणि द्रुतगती मार्ग, पुणे-मुंबई महामार्ग आणि रेल्वे या अद्ययावत सुविधांनी जोडलेल्या मावळात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. याच नागरीकरणाने आर्थिक विषमता आणली. ही आर्थिक विषमता मिटविण्यासाठी व एकत्र येण्यासाठी समृध्द सह्याद्रीच्या दुर्गम तथा अतिदुर्गम भागात दरवर्षी राजकीय व्यक्ती, उद्योजक, सेवाभावी संस्था, मंडळे यांच्याकडून दिवाळी फराळ, भेटवस्तू थंडीच्या पार्श्वभूमीवर गरम कपडे, चादर यांचे वाटप केले जाते. यावर्षी सेवाभावी संस्थांकडून दिवाळी फराळ, भेटवस्तू गेलाच नसल्याने यावेळी दिवाळ सण मोठा झालाच नसून, आनंदात तोटा मात्र झाला आहे.
यंदा शेतकरी वर्गास निसर्ग चक्रीवादळ, अवकाळी पाऊस यांचा मोठा फटका बसला आहे. पवन मावळातील फूल उत्पादक शेतकऱ्यांचे चक्रीवादळाने कंबरडे मोडले, त्यातच सरकारकडून फूल उत्पादकांना कोणतीही सरकारी मदत मिळाली नाही.
करोनाकाळात हॉटेल व्यवसाय बंद असल्याने अनेकांना काकडी, बटाटा, टोमॅटो, मिरची आदींची मागणी घटल्याने शेतमाल फेकून द्यावा लागला. अवकाळी पावसाने अनेकांच्या हाती आलेले भातपीक हिसकावून नेले. त्यातच शेतात ओलावा असल्याने अनेकांना दिवाळीआधी होणारी रब्बी पिकांची लागवडच अद्याप करता आली नाही, त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे शेतकरी चिंतातूर आहेत. आधीचे चक्रीवादळ त्यानंतर अवकाळी पाऊस यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी “दिन दिन दिवाळी, अक्षरश: “दीन’ झाली, हे अधोरेखित झाले आहे.
दिवाळी म्हटलं की नोकरदार वर्गाला मिळणारी मिठाई, बोनस आणि सुट्टी यांचा त्रिवेणी संगम. यामुळेच असतो तो उत्साह. यंदा अनेकांना करोनामुळे नोकरीच गमवावी लागली, यामध्ये मग कसली मिठाई आणि कसला बोनस. अनेकांना यावर्षी बोनसची माग
ही करता आली नाही. “नोकरी सलामत तर बोनस पचास…’ याची मात्र चांगलीच जाणीव झाली.
दिवाळीतील महत्वाचा सण म्हणजे भाऊबीज. बहिण भावाला या दिवशी औंक्षण करते, जेवायला घालते. परंतु अनेकांनी संसर्ग टाळण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून यावर्षी हा सण ऑनलाइन पद्धतीने साजरा केला. “झुक झुक आगीनगाडी’ असे म्हणत मामाच्या गावाला जाणेही अनेकांनी टाळले तेही याच करोनामुळे. तळेगाव दाभाडे, लोणावळा आदी ठिकाणी पाडवा पहाट, दिवाळी पहाट यांसारखे कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. सर्वच वर्गातील व्यापारी, कारागीर यांना दिवाळी समाधानकारक साजरी करता आली नाही.
गड-किल्ले अंधारात; गडप्रेमींमध्ये खंत
दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीची आतुरतेने वाट पाहणारे बालचमू यंदा घरात बसून कंटाळले आहेत. तरी वेळच वेळ असल्याने भव्यदिव्य किल्ले करताना हे मागे हटले नाही. अनेक ठिकाणी दरवर्षी किल्ले बनवा स्पर्धा, मुलींसाठी रांगोळी स्पर्धा आदींचे आयोजित करण्यात येते; परंतु अनेक मंडळांनी यावर्षी आयोजनच केले नसल्याने लहान मुलांचा हिरमोड झाला आहे. विशाल सह्याद्रीच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवणाऱ्या अनेक गड-किल्ल्यांवर दीपोत्सव साजरा झालाच नाही. विविध सरकारी परवानग्या व करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अनेक गड-किल्ले अंधारातच राहिल्याने गडप्रेमींनी खंत व्यक्त केली.