मुंबई – एकीकडे भाजप-शिवसेनेची युती होणारच असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजपचे सगळे नेते म्हणत असताना युती संदर्भातला निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेत असतात, असे वक्तव्य शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे. तसेच आमच्याकडे चर्चा करण्याची पद्धत नसून आवडो किंवा न आवडो पक्षप्रमुख जो निर्णय घेतात तो अंतिम असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूकीत राज्यात भाजपसाठी अनुकूल वातावरण असल्याने जागावाटपाबाबत भाजपकडून दबाव निर्माण केला जात असल्याचे शिवसेनेला वाटत आहे. त्यामुळे रावते यांनी हे वक्तव्य केले असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे केले जात आहे. सत्तेची वाटणी सम-समान होणार असेही बोलले जात आहे. या सभेत अमित शहा यांनी भाजप-सेना युतीचे सरकार येणार असे सांगितले. मात्र, मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच असतील असेही स्पष्टपणे जाहीर केले. त्यामुळे शिवसेनेच्या दबावाचा परिणाम होणार नाही असेही स्पष्टपणे त्यांनी सांगून टाकले.