माधव विद्वांस
पोवाडे, भारुडे, भजने, भक्तिगीते सहज सादर करणारे लोकनाट्यकार, समाजसेवक शाहीर साबळे यांची आज जयंती.त्यांचे पूर्ण नाव कृष्णराव गणपतराव साबळे. त्यांचा जन्म वाई जवळील पसरणी या खेड्यात 3 सप्टेंबर 1923 रोजी झाला. त्यांचे शिक्षण व्हावे म्हणून त्यांना आईने अमळनेरला आजीकडे पाठविले. त्यांना गायनाची आवड लहानपणापासूनच होती. हिराबाई बडोदेकर यांनी तेथे साबळे यांचे गाणे योगायोगाने ऐकले व त्यांच्या आवाजाचे कौतुक केले होते. त्यांची गाण्याची आवड लक्षात येताच आजीने उगाच अपूर्वाद नको म्हणून त्यांना परत पसरणीला पाठवून दिले. दरम्यान अमळनेर येथे त्यांची साने गुरुजींशी भेट झाली. त्यांच्या विचारांनी ते भारावून गेले.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या कलापथकाने दौरे केले. खुद्द त्यांच्या पसरणी गावात त्यांनी तेथील युवकांच्या सहाय्याने हरिजनांसाठी भैरवनाथ मंदिर प्रवेशाचा सोहळा साने गुरुजींच्या उपस्थितीत घडवून आणला. 1948 मध्ये भानुमती बारसोडे या सुविद्य युवतीशी त्यांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला. त्या चांगल्या कवयित्री असल्यामुळे त्यांची शाहिरांना उत्तम साथ मिळाली.
त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात तसेच चलेजाव चळवळ, हैद्राबाद मुक्तिसंग्राम व गोवा मुक्ती आंदोलनातही सक्रिय भाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते अग्रेसर होते. त्यावेळी त्यांच्या पोवाड्यांनी महाराष्ट्रात ऊर्जा जागृत केली होती. दारूबंदीसाठी ते प्रबोधनपर व्याख्याने व गीते सादर करीत असत. त्यांचे “आंधळं दळतंय’ लोकनाट्य खूपच गाजले होते.
वृद्ध व निराधार कलाकारांना स्वाभिमानाने जगता यावे आणि आपली कला तरुण पिढीला शिकविता यावी, यासाठी त्यांनी “शाहीर साबळे प्रतिष्ठान’ची स्थापना केली (1989). ह्या प्रतिष्ठानासाठी त्यांनी पसरणीजवळची वडिलोपार्जित 8 एकर जमीन दिली. ह्यातूनच पुढे वृद्घ, निराधार कलावंतांसाठी “तपस्याश्रमा’ची कल्पना फलद्रूप झाली. त्यांची खरी ओळख राज बढे यांनी रचलेल्या व श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेल्या व त्यांनी आपल्या वीरश्रीयुक्त आवाजात गायलेल्या “महाराष्ट्र गीता’ने महाराष्ट्राला झाली. त्यांचे एकनाथांचे विंचू चावला हे भारुडही खूप प्रसिद्ध झाले. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ही संत केशवदास यांची रचना त्यांनी संगीतासह गायली. त्यांचे चिरंजीव देवदत्त साबळे यांनी संगीत दिलेले “आठशे खिडक्या नऊशे दारं’ या कोळी गीताला त्यांनी आवाज दिला होता.
त्यांचा वारसा त्यांचे चिरंजीव देवदत्त (गीतकार-संगीतकार), कन्या चारुशीला साबळे-वाच्छानी (नर्तिका आणि अभिनेत्री) तसेच त्यांचा नातू केदार शिंदे (रंगभूमी व दूरदर्शनवरचे लेखक-दिग्दर्शक निर्माते) पुढे चालवीत आहेत. 20 मार्च 2015 रोजी त्यांचे निधन झाले. भारत सरकारतर्फे त्यांना “पद्मश्री’ किताब देऊन गौरविण्यात आले.