प्रशांत जाधव
कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवून बेस्ट पोलिसिंग करणार; पोलिसांना देणार हक्काची घरे
सातारा – सातारा जिल्हा पोलीस दल हे कायमच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्या भावनेने काम करत आले आहे. ते काम पुढेही होत राहील. यापुढे पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहून जिल्ह्यात “बेस्ट पोलिसिंग’ केले जाईल. महिला सुरक्षा हा पोलीस दलाचा प्राधान्याचा विषय राहील, अशी ग्वाही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना व्यक्त केला.
नव्या वर्षाचे स्वागत करताना महत्त्वाच्या शासकीय विभागांच्या प्रमुखांनी त्या त्या विभागासाठी वर्षभरातील केलेले संकल्प “प्रभात’ने जाणून घेतले आहेत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्हा पोलीस दलाने केलेल्या संकल्पांची माहिती दिली. आगामी काळात सातारा पोलिसांची कार्यपद्धती व कुटुंबप्रमुख म्हणून पोलीस दलाविषयी त्यांच्या मनातील संकल्पना त्यांनी स्पष्ट केल्या. गुन्हा घडल्यानंतर पोलीस तपास करतातच; पण गुन्हे घडू नयेत यासाठी “प्रीव्हेन्टिव्ह पोलिसिंग’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
त्यासाठी छोटेमोठे गुन्हे करणाऱ्या जिल्ह्यातील प्रवृत्तींवर लक्ष केंद्रित करण्यात येईल. त्यांच्या गुन्हेगारीचा वेळीच बिमोड करण्याचे धोरण या वर्षात राबवले जाईल. गुन्हेगार, अवैध धंद्यांचे अड्डे, टोळ्यांना पायबंद घालण्यासाठी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जनतेशी अधिक सुसंवाद घडवण्यात येईल. जनतेकडून गुन्हेगारीविषयीची माहिती मिळावी आणि त्याचा उपयोग गुन्हेगारी रोखण्यासाठी करता यावा, म्हणून जनता व पोलीस यांच्यातील समन्वय कायम राखण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सामान्य जनतेला पोलिसांची भीती वाटू नये म्हणून “कम्युनिटी पोलिसिंग’ची संकल्पना राबवली जाईल, असे सातपुते यांनी सांगितले.
महिलांशी निगडीत गुन्हे व त्यांच्यावरील अत्याचार, छेडछाड कमी करण्यासाठी निर्भया पथके प्रभावीपणे कार्यरत राहतील, याची खबरदारी घेण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत महिलांची छेडछाड करणाऱ्यांना इतर प्रवृत्तींना माफ केले जाणार नाही. हे सगळे करतानाच पोलीस दलाचा कणा असलेल्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. गतवर्षात चार पोलीस बांधवाना हृयविकाराने जीव गमवावा लागला.
त्यामुळे त्यांचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी विविध व्यायाम, आहार याबाबत तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन केले जाईल. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगाराचे योग्य नियोजन करण्यासाठी, भविष्यात त्या पैशाचा योग्य विनियोग व्हावा आणि कर्मचाऱ्यांनी योग्य प्रकारे गुंतवणूक करावी, यासाठीही मार्गदर्शन केले जाईल, असे सातपुते यांनी स्पष्ट केले.