मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील नाराजी नाट्य काही संपण्याचे नाव घेत नाही. आता काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित मंत्र्यांना न विचारता अधिकारी प्रस्ताव मंजुरीसाठी देत असल्याने अशोक चव्हाण नाराज आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी अशोक चव्हाण यांना न विचारता मंजुरीसाठी मांडल्याने ते संतप्त झाले. अधिकारी परस्पर प्रस्ताव देत असून संबंधित मंत्र्यांनाच गृहत धरत असल्याच्या भावना अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुद्द्यावरुन चांगलेच घमासान झाले असल्याची माहिती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे निर्णय चव्हाण यांना डावलून होत असल्य़ाची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सत्तेत आल्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे नेहमीच समोर आले आहे. तसेच अधिकारी विरुद्ध मंत्री असा सामनाही रंगलेला पाहायला मिळाला आहे. अधिकारी संबंधित विभागाच्या मंत्र्यांना न सांगताच निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतात. सध्याच्या खात्यांचे विभाजन होऊन नवीन खाती निर्माण होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसी यांचे विभाजन करुन नवी खाते निर्माण करण्याचा प्रस्तावही अशोक चव्हाणांना न सांगता आणला होता.
आता या विभागांना मंजुरी देण्याची वेळ आली तेव्हा देखील ती फाईल अशोक चव्हाणांसमोर ठेवली नव्हती. त्यामुळे अशोक चव्हाण तीव्र संतापले आणि त्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. “ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही,” असं म्हणत अशोक चव्हाण यांनी यापूर्वीही आपली नाराजी व्यक्त केली होती. तीनही पक्षांना समान अधिकार हवेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले होते.