पुणे जिल्हा ( वाघळवाडी प्रतिनिधी) – जिल्ह्यात गेले काही दिवसापासून असणारा पावसाचा जोर अद्याप कायम आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी नद्यांना पुर आल्याने गावांचा सपंर्क तुटला आहे.
सध्या वीर धरणातून ६१००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग चालू आहे. तथापि यामध्ये ओढ़े-नाले यांचा विसर्ग मिळाल्याने वाढ होऊन तो ६५००० ते ७०००० असु शकतो . वीर धरणातील पाणी आवक ६५००० क्युसेक्स आहे. त्यातच गुंजवणी व देवघर धरणांचा विसर्ग चालू आहे. भाटघर धरणातील विसर्ग दुपारी २ च्या दरम्यान चालू होणार आहे. हा विसर्ग १६००० क्युसेक्स असण्याची शक्यता आहे. यामुळे वीर धरणामधील विसर्गात वाढ करावा लागेल व तो ७६००० क्युसेक्सपर्यत वाढवावा लागेल. परिणामी नद्याच्या पाणी पातळीत वाढ होत असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
मुरूम (ता.बारामती) येथील नीरा नदीवरील जुना रस्ता बंधारा पूल पाण्याखाली गेला आहे. निरामाई दुतर्फा भरून वहात आहे, त्यामुळे नीरा नदी काठी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी शिरल्याने उभ्या ऊसाच्या पीकाची नासाडी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नीरा नदीकाठच्या गावांना तसेच शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच नीरा नदीवरील पूल व सखल भागातील नागरी वसाहतींची ठिकाण येथे सबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेश विजय नलवडे, सहाय्यक अभियंता, वीर धरण उपविभाग यांनी दिले आहेत.