पाटण – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पानेरी वाल्मिकी (ता. पाटण) येथे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्यावतीने निसर्ग अध्ययन केंद्र मंजूर झाले होते. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या निसर्ग अध्ययन केंद्राची इमारत न बांधता मंजूर निधी लाटण्यात आला आहे. तर वाढीव निधीचीही परस्पर विल्हेवाट सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी लावली आहे. त्यामुळे या प्रकरणाची प्राधिकरणाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी केली आहे.
श्री. भाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पानेरी वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये समाविष्ट आहे. याठिकाणी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने 2017- 18 मध्ये निसर्ग अध्ययन केंद्र इमारतीसाठी 30 लाखांचा निधी मंजूर केला होता. यासाठी खा. श्रीनिवास पाटील यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्याच हस्ते या अध्ययन केंद्राचे भूमिपूजनही झाले. मात्र, या अध्ययन केंद्रासाठी वाढीव निधीची आवश्यकता आहे असे भासवून आणखी दहा लाख रुपयांचा निधी प्राप्त करून घेतला. तो निधी खर्च न करता परस्पर वळवण्यात आला. निसर्ग अध्ययन केंद्र पूर्ण झाले असून पायाभूत सुविधेचा निधी खर्च केला आहे असे सांगून तसा खोटा अहवाल सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय प्राधिकरणाकडे पाठवला.
हा अहवाल खोटा असून दिशाभूल करणारा आहे. वास्तविक याठिकाणी निसर्ग अध्ययन केंद्र उभारले नाही तसेच पायाभूत सुविधा, साहित्य, चिन्ह यासाठीही खर्च करण्यात आला नाही. तरीही सुमारे 40 लाखांचा खर्च सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी या बाबींमध्ये खर्च झाल्याचे दाखवले आहे. त्यामुळे या संपूर्ण निधीचा गैरव्यवहार करुन राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाची दिशाभूल करत अधिकाऱ्यांनी खोटे पत्र सादर केले आहे, असे भाटे यांनी स्पष्ट केले. निसर्ग अध्ययन केंद्रासाठी आलेला निधी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य संरक्षकांकडून आवश्यक मंजुरी न घेता अधिकाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी इतर कामांना वळवला आहे. त्यामुळे प्राधिकरणाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाटे यांनी केली आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून नागपूरच्या मुख्य वनसंरक्षकांकडे खुलासा मागितला होता. परंतु, कोणताही खुलासा त्यांनी दिलेला नाही. केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनाही याबाबत कळवले आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले. परंतु, आजपर्यंत कोणताही खुलासा झालेला नाही. खर्च करण्यात आलेला निधी संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावा.
रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक, सातारा