नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तास्थापनेचे भाजप-शिवसेनेला विचारा, अशी प्रतिक्रिया देत सर्वांनाचा बुचकळ्यात टाकले होते. परंतु, महाशिवआघाडीचे सरकार स्थापनेवर शरद पवारांनीच शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेनेसोबत सरकार स्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याविषयीच्या हालचालींचे केंद्र आता मुंबईहून दिल्लीला हलले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून लवकरच सत्तास्थापन होईल, असे संकेत तीनही पक्षांनी दिले आहेत. शिवसेनेसोबत सरकार स्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात असून दोन ते तीन दिवसांत संपेल. आज सामायिक कार्यक्रम निश्चित होईल, अशी माहिती शरद पवार यांनी सांगितली आहे.
दरम्यान, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. नव्या आघाडीचे नाव काय असेल? तसेच तीन पक्ष एकत्र आले तर येत्या मुंबई महानगरपालिकेत निवडणुकांची स्थिती कशी असेल, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहे.