पुणे – मत्स्यव्यवसायासाठी तलावांच्या लिलाव प्रक्रियेमध्ये ज्या तलावांचे लिलाव निर्धारित किंमतीपेक्षा कमी आलेले आहेत, अशा सर्व देयकांच्या फेरनिविदा काढण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. विशेषत: खेड तालुक्यातील तलावांच्या लिलावाबाबत जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तात्काळ ठोस निर्णय घेत या तालुक्यातील तलाव हे खूपच कमी किंमतीमध्ये विकले गेले असल्याने, रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यामध्ये सुमारे चारशे ते साडेचारशे तलाव असे आहेत, की जेथे किमान आठ ते बारमाही पाणी असते. असे तलाव मासेमारीसाठी तीन वर्षे लिलावाने देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. त्यामध्ये किमान आठ ते दहा कोटी रुपये उत्पन्न जिल्हा परिषदेला मिळू शकते. या लिलाव प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी किंमत आली आहे.
अशा लिलावाची पडताळणी करून रद्द केले जातील असे आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर यांनी या संदर्भात सीईओ यांना पत्र देऊन लिलाव प्रक्रियेमध्ये कातकरी भोई अशा पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय असणाऱ्या घटकांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतली होती. परंतु प्रत्यक्षात त्यांना डावलून कमी किंमतीमध्ये लिलाव दिले जात असल्याकडे लक्ष वेधले होते.
ज्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी किंमत मिळाली आहे, अशा तलावांचे लिलाव रद्द केले जातील. तसेच लिलावाच्या किंमतीबद्दल फेर पडताळणी करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाला दिलेले आहेत.
-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पुणे