पुणे – जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. जुलै ते डिसेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना व आरक्षण करण्याचे निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. आयोगाकडून प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम देऊन त्यावेळेत पूर्ण करण्यास सांगितले आहे.
लॉकडाऊनमध्ये शासनाकडून शिथीलता आणण्यासंदर्भात वेळोवेळी निर्देश देण्यात येत आहेत. त्यामुळे आता प्रभाग रचना व आरक्षण अंतिम करण्याच्या तारखा आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मंगळवारी (दि.27) उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देण्याच्या सूचना केल्या आहेत. तर दि. 2 नोव्हेबरला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला प्रसिद्धी देण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, लॉकडाऊनमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपेल त्याठिकाणी प्रशासकाची नेमणूक करावी. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील जवळपास साडेसातशे ग्रामपंचायतींची मुदत टप्प्याटप्प्यात संपली. त्याठिकाणी जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक केली आहे.