ग्रामपंचायतींचा फड ऑक्टोबर हिटमध्ये तापला
पंचवार्षिक 25 तर 21 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक थरार
राजगुरूनगर – अत्यंत टोकाच्या राजकारणातून ग्रामविकासाची स्वप्न दाखविणाऱ्या लोकशाहीचा उत्सव म्हणून ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका ओळखल्या जातात. यंदा 5 नोव्हेंबरला खेड तालुक्यातील संवेदनशील व मातब्बर अशा 46 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिकसह पोटनिवडणुका होणार आहेत. ऐन ऑक्टोबर “हिट’मध्ये निवडणुकीचा “फड’ तापणार आहे.
तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पॅनलचे नेते, गावपुढारी यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. यंदा गावागावांत इच्छुकांची संख्या जास्त असल्याने निवडणुका चुरशीच्या होतील, यात शंका नाही. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर यंदाची निवडणूक तरुणाईभोवती केंद्रित होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकींच्या इतिहासावर नजर टाकली असता, तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या आहेत. यंदाही चुरशीची परंपरा कायम राहील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. तालुक्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. काही गावांमध्ये फेररचना करण्यात आल्याने अनेकांची पंचाईत झाली आहे.
वॉर्ड फेररचनेत झालेला बदल, महिलांचे आरक्षण यामुळे इच्छुक उमेदवारांना अन्य वॉर्डमध्ये आपले नशीब अजमावे लागणार आहे. दरम्यान, खेड तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक तर 21 ग्रामपंचायतींच्या 32 रिक्त जागांसाठी अशा एकूण 46 ग्रामपंचायतींचे बिगूल वाजले असून वातावरणही तापायला सुरुवात झाली आहे.
उमेदवारांचा शोध सुरू
इच्छुक तरुणांच्या स्पर्धेमुळे निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची शक्यता आहे. गावनिहाय विजयी होणाऱ्या उमेदवारांचा पॅनलप्रमुखांकडून शोध सुरू आहे. इच्छुकांनी निवडणूक लढविण्यासाठी एकापेक्षा अधिक वॉर्डमध्ये चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे खेड तालुक्यामध्ये आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
प्रत्येक पक्षासाठी रंगीत तालीम?
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. खेड तालुक्यातील 46 ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार आहे. 6 ऑक्टोबर पासून निवडणूक प्रक्रियेला तहसील कार्यालयात प्रारंभ झाला असून 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही निवडणूक होत असल्याने प्रत्येक पक्षासाठी ती रंगीत तालीम ठरणार आहे.
युवकांचा कल अधिक
राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक समजली जाते. या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने या निवडणुकीत युवक वर्गाचा मोठा कल दिसून येत आहे. गावावर राजकीय वर्चस्व कोणाचे याची गावस्तरावर युवकांची चाचपणी सुरू आहे.