सातारा -भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत शुक्रवारी भेट घेतली. यावेळी सागर बंगल्यात उभयतांमध्ये राज्यातील राजकीय घडामोडींवर खलबते झाली. या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. फडणवीस यांच्या कुशल रणनीतीचे उदयनराजे यांनी कौतुक केले. त्यांनी फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. दरम्यान, या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना, आमदारांना कोणी धमक्या दिल्या, तर मला सांगा, मी आहेच, असे वक्तव्य उदयनराजेंनी केले.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणूक प्रक्रियेमुळे खा. उदयनराजे भोसले दोन दिवस दिल्लीत होते. ते शुक्रवारी मुंबईत आले. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सागर’ या शासकीय बंगल्यावर भेट घेतली. राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये चाणक्याची भूमिका बजावणाऱ्या फडणवीस यांचे उदयनराजेंनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार आहे.
त्यासाठी सर्वप्रथम माझ्याकडून अभिनंदन, असे उदयनराजे म्हणाले. त्यानंतर त्यांची फडणवीसांबरोबर राजकीय खलबते झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याचे उदयनराजेंच्या निकटवर्तीयांनी सांगितले. या भेटीनंतर मुंबईत प्रसारमाध्यमांनी गाठले असता, उदयनराजेंनी नेहमीच्या शैलीत वक्तव्ये केली. जे तुटायचे होते, ती युती आता तुटली आहे. सरकार पडले आहे. कोणीही धमक्या देऊ नयेत. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. असल्या पोकळ कोणत्या धमक्यांना मी भीक घालणार नाही. पुन्हा धमक्या आल्या, तर मला सांगा, मी बघतोच, असा इशारा त्यांनी दिला आहे.