हैदराबाद – आपण येणारी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा प्रख्यात निर्माता दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी केली आहे. आपण अचानकच हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आंध्र प्रदेशातील पीठापुरम येथून आपण रिंगणात उतरणार असल्याचेही त्यांनी ट्वीटरवर जाहीर केले आहे.
आंध्रमध्ये भारतीय जनता पार्टी- तेलगु देसम आणि जनसेना या पक्षांची युती झाली आहे. त्यानंतर सुपरस्टार पवन कल्याण यांना पीठापुरम येथून रिंगणात उतरवण्याची घोषणा या युतीकडून करण्यात आली आहे त्यानंतर लगेचच रामगोपाल वर्मा यांनी आपणही येथून लढणार असल्याची घोषणा केली आहे.
वर्मा यांनी गेल्याच वर्षी आंध्र प्रदेशातील राजकारणावर व्यूहम नावाचा चित्रपट केला होता. त्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी वर्मा यांना राज्यातून तडीपार करण्याची मागणी केली होती. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांच्या मृत्यूशी संबंधित घटनाक्रमावर आधारित हा चित्रपट होता.