मुंबई – फर्जंद,पावनखिंड,फत्तेशीकस्त अशा दर्जेदार ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे दिग्पाल लांजेकर यांच्या सोशल मीडियावरील एक पोस्टची सध्या चांगलीच चर्चा आहे. कारणही तसच आहे. दिग्पालने केलेल्या पोस्टमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी भेट झाल्याचे नमूद केले आहे. तसेच बालपणापासून स्वयंसेवक असलेल्या मला यावेळची पर्वणी मिळाली असल्याचे दिग्पालने आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
“रेशीमबाग” या ठिकाणी जाण्याचं, ती वास्तू अनुभवण्याचं, प्रत्येक स्वयंसेवकाचं स्वप्न असतं आणि या सगळ्यात तुम्हाला संघाच्या कुटुंबप्रमुखांचा म्हणजेच सरसंघचालकांचा सहवास लाभणार असेल तर ? बालपणापासून स्वयंसेवक असलेल्या मला आणि माझा बंधू निखिल याला हीच पर्वणी मिळाली २५ आणि २६ जुलैला या दोन दिवसातले काही क्षण नव्हे तर काही तास माझ्या आयुष्याला सुवर्ण अनुभवाचे दान देऊन गेले असलत्याचे दिग्पालाने आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
काय म्हटलंय नेमकं दिग्पालाने आपल्या पोस्टमध्ये
शिवराज अष्टकातील चौथे पुष्प शेर शिवराज रिलीझ झाला आणि मला संघाचे प्रचारक यशोवर्धन वाळींबे यांचा फोन आला. “अरे मोहनजींनी २५ आणि २६ जुलैला रेशीमबाग येथे “पावनखिंड” आणि “शेर शिवराज – स्वारी अफझलखान” हे दोन्ही चित्रपट पाहता येतील का ?” अशी विचारणा त्यांनी केली. प्रत्यक्ष सरसंघचालक आपली कलाकृती पाहणार ? अधीरता उत्सुकता आणि काहीसा सुखद तणाव सगळ्या भावनांचा कल्लोळ घेऊन आम्ही नागपूरला पोचलो असं दिग्पाल आपल्या पोस्टमध्ये म्हणतो.
मी , मृणालताई, अजयदादा , निखिल, राजवारसा प्रॉडक्शन्सचे निर्माते प्रद्योतजी पेंढरकर, अनिलराव वरखडे आणि क्रिएटिव्ह हेड प्रसादजी कुऱ्हे २५ तारखेला रेशिमबागेत दाखल झालो. पू. डॉक्टरांच्या आणि श्रीगुरूजींच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पावनखिंडचं प्रदर्शन करण्यात आलं. ही कलाकृती पाहताना काहीजणांना भाषा कळत नव्हती,पण भावना सगळ्यांना भिडत होती.
शेवटी बाजीप्रभू आणि बांदल वीरांच्या त्यागाने बलिदानाने भावविभोर झालेल्या त्या देशभक्त कार्यकर्त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मोहनजींनी दुसऱ्या दिवशी न्याहारीला भेटण्याचा निरोप दिला आणि भारावलेल्या मनानं आम्ही रेशिमबाग सोडली. २६ जुलैला संस्कारभारतीचे अध्यक्ष दादा गोखले यांनी एक वेगळेच सरप्राईझ दिले. यानंतर शेर शिवराज या चित्रपटाचे प्रदर्शन झाले. आम्ही प्रतिक्रीयेच्या अपेक्षेनं मोहनजींकडे पाहिलं, ते म्हणाले “या कलाकृतींमधून वंदनीय शिवचरीत्र साकारून तुम्ही राष्ट्रीय कार्य करत आहात.हे कार्य असंच चालू ठेवा…” सहजपणे पाठीवर एक शाबसकी देऊन मोहनजी पुढच्या बैठकीला निघून गेले. या शाबासकीचा आनंद मनात घोळवत असतानाच एक वाक्य रूंजी घालत होतं. “इदं न मम … इदं राष्ट्राय … इदं शिवराजाय …” श्री छत्रपती शिवरायर्पणमस्तु …भारत माता की जय…
View this post on Instagram
अशा आशयाची पोस्ट दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या इंस्टाग्रामवरून केली आहे. या सर्व कार्यक्रमावेळी दिग्पाल यांच्यासह मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर हे देखील उपस्थित होते.