पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आगामी लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारीची कामे जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. निवडणुकीसाठी प्रशासनाच्या विविध विभागांकडून मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे.
मात्र, अजूनही सुमारे 50 अधिकारी-कर्मचारी हे निवडणुकीच्या कामासाठी नेमून दिलेल्या ठिकाणी हजर होत नसल्याचे दिसून आले, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना नोटीस बजाविण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या काम करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेकडून लोकसभा निवडणुकीचे कामकाज पाहिले जाते. मतदार यादी, मतदान केंद्र तयारी, मतदानासाठी मतदारांची जागृती करणे, मनुष्यबळ पुरविणे, मतदानाचे साहित्य, ईव्हीएम तपासणी, आदी कामकाजासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते, एकट्या निवडणूक शाखेतील कर्मचाऱ्यांकडून ही कामे पूर्ण करण्यास मर्यादा येतात.
त्यामुळे शासनाच्या इतर विभागांकडून मनुष्यबळाची मागणी करण्यात येते. त्यानुसार कर्मचाऱ्यांची माहिती देऊन कर्मचारी वर्ग केले जातात. मात्र, वारंवार पत्र पाठवूनही काही कर्मचारी हजर राहत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे.
त्यामुळे निवडणूक शाखेने अशा कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. जर हे कर्मचारी-अधिकारी उपस्थित राहिले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.