पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचे आदेश काढले आहेत. या आदेशानंतर महापालिकेचे अनेक कर्मचारी जिल्हा प्रशासनाकडे रुजू झाले आहेत.
मात्र, त्यांची यादीच महापालिकेकडे नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोणता कर्मचारी कोणत्या कामासाठी घेतला आहे, याची माहिती महापालिकाच जिल्हा प्रशासनाकडे मागणार आहे. त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी नेमके गेले तरी कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
निवडणुकांच्या कामांसाठी जिल्हा प्रशासनाने महापालिकेकडे कर्मचाऱ्यांची यादी मागविली होती. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने ती पाठविली. त्यातील ज्या कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली, त्यांना जिल्हा प्रशासनाकडून थेट विभाग प्रमुखांकडे पत्र पाठविण्यात आले. त्यानंतरही या पत्राकडे कर्मचारी गांभीर्याने घेत नसल्याने जिल्हा प्रशासनाने महापालिकेकडे तक्रार करत थेट कारवाईचा इशारा दिला.
त्यानंतर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांना आदेश काढत निवडणुकांच्या कामांसाठी कर्मचारी तत्काळ सोडण्याचे आदेश दिले. प्रत्यक्षात याबाबतचे नियोजन तसेच जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती सामान्य प्रशासन विभागाने ठेवणे आवश्यक होते. मात्र, ती ठेवण्यात आली नसल्याने हा गोंधळ उडालेला आहे.
सामान्य प्रशासन विभागाचा प्रभारी पदभार काही दिवसांपूर्वीच माझ्याकडे आला आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी दिलेल्या कर्मचारी माहिती घेतली जात असून, याबाबत जिल्हा प्रशासनास पत्र पाठविण्यात येणार आहे. तसेच त्यांना आणखी किती कर्मचारी हवेत, याचीही माहिती घेतली जात आहे. – महेश पाटील, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग