संगीता पाचंगे
पिंपळे गुरव -जुनी सांगवी येथील श्री हाईट्स इमारतीच्या तळमजल्यावर असणाऱ्या टपाल कार्यालयाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. कार्यालयाच्या इमारतीच्या छतामधून पाणीगळती सुरू आहे. त्यामुळे टपाल कार्यालयात पाणी होत असून ओलसर पणामुळे ऑफिसमध्ये कुबट वास येत आहे. त्यामुळे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील कार्यालयाची दुरुस्ती करावी, अथवा कार्यालय दुसऱ्या ठिकाणी हलवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कार्यालयात टपकणारे पाणी हे पावसाचे नसून चक्क शौचालयाचे आहे. त्यामुळे कार्यालयात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. त्यातच चिचुंद्री, उंदरांचा वावर पाहण्यास मिळत आहे. टपाल कार्यालयातील महिला अधिकारी उंदीर, घुसी यांमुळे चक्क खुर्चीवर मांडी घालून काम करत आहेत. मागील काही दिवसांपासून हे दूषित पाणी कार्यालयात येत असल्याने सकाळी कार्यालय उघडल्यानंतर अक्षरशः कर्मचारी व अधिकाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. संबंधित वरिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष न करता येथील टपाल कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची होणारी कुचंबणा त्वरित थांबवावी, अशी मागणी होत आहे.
टपाल कार्यालयात गळती होत असल्याची माहिती मिळाली. इमारतीच्या मालकाला तसे कळविले आहे. येत्या दोन दिवसांत दुरुस्ती करून देत आहेत. त्यानंतर मी स्वतः पाहणी करतो. तेथील पाहणी करून सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
– नितीन बने, पिंपरी पोस्ट ऑफिस,
जनसंपर्क डाक निरीक्षक.
आम्ही दररोज आरडीचे पैसे जमा करण्यासाठी सकाळी येतो. आम्ही दररोज सकाळी बारा ते पंधरा जणी येत असतो. गळती थांबविली जाईल, दुरुस्ती होईल, कुबट वास, दुर्गंधी याचे काय? चिचुंद्री, उंदरांचा वावर कसा बंद करणार? मुळात टपाल कार्यालय सुसज्ज अशा जागेत असावे. जिथे शौचालय, पाण्याची सोय, बेसिन, बसण्याची सोय असावी.
– महिला एजंट, जुनी सांगवी.
आठ दिवसांपूर्वी मी येथील कार्यालयाचा पदभार स्वीकारला आहे. अस्वच्छता आणि पाणीगळतीमुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तसेच उंदीर, घूस यांचा वावर वाढल्याने काम करणे कठीण होत आहे. तसेच सफाई कर्मचारी दुपारी येत असल्याने स्वच्छतेची सर्व कामे सकाळी मला करावी लागत आहेत. अनेकदा वरिष्ठांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही.
– मोनिका जैन, पोस्ट ऑफिसर.