इंदापूर, (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या कधीही स्मृती पाटलावरून जात नाही. येथीलच वर्गात शिकलेली अक्षरे जीवनाला आगामी काळात आकार देतात. प्राथमिक शाळेचे गुरुजी, मॅडम, त्यांनी शिकवलेल्या अध्ययनाच्या पलीकडे कायमस्वरूपी स्मरणात राहतात, हीच बालचिमुरडी मुले आमच्या कायमस्वरूपी हृदयात घर करून राहतात. असे प्रतिपादन सुरवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय तोरसकर यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरवड येथे इयत्ता चौथीच्या मुलांचा निरोप समारंभ शिक्षकांनी मुलांना गोड जेवण देऊन उत्साहात पार पडला. यावेळी मुख्याध्यापक तोरसकर विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करत होते. पुढे बोलताना मुख्याध्यापक दत्तात्रय तोरसकर म्हणाले, विद्यार्थी हा शाळेचा अलंकार आहे. माझ्या गावातील सर्व मुले शिकून मोठ्या पदावर गेली पाहिजेत.
हीच अपेक्षा आमचे असते. सुरवड शाळेचा इतिहास प्रचंड मोठा असून, येथील शैक्षणिक संकुलात शिकलेला विद्यार्थी कधी वाया गेला नाही. असाही विश्वास तोरसकर यांनी व्यक्त केला.
या प्राथमिक शाळेच्या शिक्षिका नीलिमा शिंगाडे, विनया गदादे, सिंधू बनसोडे, गणेश ढेरे यांनी निरोप समारंभ यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले धनश्री बनसुडे, सिद्धार्थ बनसोडे, वैष्णवी घोगरे, ओंकार थोरात, तनिष्का बनसुडे यांनी सर्व गुरुजनांबद्दल आदर व्यक्त केला.