पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऐनवेळी घातलेल्या जाचक अटींमुळे गुणवंत विद्यार्थ्यांना पात्र असूनही विद्यापीठाद्वारे दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनासाठी अर्ज करण्यास मोठ्या अडचण येत आहेत . त्यामुळे जाचक अटी काढून पात्र गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष समितीतर्फे विद्यापीठाकडे करण्यात आली आहे.
पुणे विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले, अण्णा भाऊ साठे, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद यांसारख्या विविध शिष्यवृत्ती योजना अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
मात्र, ऐनवेळी घातलेल्या जाचक अटींमुळे गुणवंत विद्यार्थ्यांना पात्र असूनही विद्यापीठाद्वारे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करता येत नाही. दरम्यान, शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांस ही योजना लागू राहणार नाही, ही जाचक अट असून ती काढण्यात यावी, अशी मागणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष समितीचे राहुल ससाने यांनी कुलगुरुंकडे केली आहे.