कोपरगाव (प्रतिनिधी): मालेगाव मध्ये करोना बाधीत आजाराने थैमान घातले आहे. मालेगावच्या नागरीकांनी करोना संसर्गजन्य आजापासुन विषेश काळजी घेतली नाही, शिस्त पाळली नाही, म्हणून त्या भागात सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र सध्या कोपरगावात एकही करोनाबाधीत रुग्ण नाही. गेल्या दिड महिन्यांपासून नागरीकांनी घरात बसुन प्रशासनाला सहकार्य केले. उद्योग व्यवसाय बंद ठेवले. नागरीकांच्या हाताला काम नाही. उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्याने पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच पुन्हा लॉकडाउनच्या नावाखाली दैनंदीन व्यवहार बंद ठेवले तर हातावर पोट असणाऱ्यांसह सर्वसामान्य नागरीकांची भुकबळी होण्याची शक्यता आहे, असे मत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केले.
राज्य सरकारने जिल्ह्याची झोननिहाय विभागणी केली आहे, मात्र ज्या तालुक्यात करोनाचा एकही रुग्ण नाही तेथील छोटे मोठे व्यवसाय, कामकाज सुरू करण्यात यावे. रेडझोन बाबत नियम असावे. मात्र एकही रुग्ण नाही अशा तालुक्यात शासनाने काही अटी व शर्तींवर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आज शासनाकडे केली. तहसीलदार योगेश चंद्रे यांच्यासमवेत तातडीची बैठक घेवून त्यांनी ही मागणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह शहरातील छोटे-मोठे व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.
कोल्हे पुढे म्हणाल्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न निर्माण झाले असून नागरिकांनी शासनाला सहकार्य केले आहे. सर्वांचेच व्यवसाय बंद असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरीकांचे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाल्याने खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा नगरपालिकेने नागरीकांच्या पाठीमागे खंबीर उभे राहून शहरारची पाणी व घरपट्टी माफ करावी. लोकांना पोटापाण्यासाठी पैसे नाहीत त्यामुळे पालिकेने अशा वाईट प्रसंगी नागरिकांच्या सहकार्य केले पाहिजे.
सहकारी पतसंस्थांनी देखील काही महिन्याचे व्याज माफ करावे. माणसाच्या पाठीमागे माणुसकीने उभे राहण्याची ही वेळ आली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर सकारात्मक योग्य निर्णय घेवून ठप्प झालेली बाजारपेठ अटीशर्तीवर माणुसकीच्या भावनेतून सुरू करावी. अशी व्यथा तहसीलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्याकडे पोटतिडकीने मांडल्या
दरम्यान कोपरगाव शहरातील दुकाने व छोटे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना फोनवरून कोल्हे यांनी संपर्क साधून विनंती केली.
कोपरगाव तालुका नागरिकांच्या सहकार्यामुळे व प्रशासनाच्या प्रयत्नामुळे करोना मुक्त आहे. जिल्हा प्रशासनाने नगर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्याचे जाहीर केले आहे नागरिक व व्यापारी आजही प्रशासनाला सहकार्य करत आहेत हाताला काम नसल्यामुळे व आर्थिक गणित कोलमडल्यामुळे छोटे व मोठे व्यापाऱ्यांची जीवन जगणे मुश्कील झाले आहे. पर्यायाने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शासनाने नियम व अटी च्या शर्तीवर छोट्या व मोठ्या दुकानदारांना आपापली आस्थापने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी हार्डवेअर व प्लंबिंग संघटना बांधकाम मजूर संघटना. वाईन शॉप,स्टेशनरी व कापड विक्रेते इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक संघटना गॅरेज संघटना चर्मकार सुवर्णकार नाभिक संघटना परीट समाज व किराणा व्यापारी आदींच्या वतीने करण्यात आली आहे. नागरीकांच्या मागणीचा सकारात्मक विचार करुन वरिष्ठांशी चर्चा करून येत्या एक दोन दिवसात योग्य मार्ग काढण्याचे अभिवचन तहसीलदार चंद्रे यांनी दिले.