मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी महान खेळाडू आहे. तो स्वत:ला संघावर लादणार नाही. पुनरागमन करण्यासाठी किती मेहनत घ्यायची आहे, हे त्याला चांगले ठाऊक आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याने क्रिकेटमधून विश्रांती घेतली असली तरी तो लवकरच पुनरागमन करेल, असा विश्वास भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला.
2020 च्या आयपीएलमध्ये तो नक्की पुनरागमन करेल, अशीही खात्री शास्त्री यांनी दिली आहे.
भारताचा सर्वाधिक अनुभवी फलंदाज महेंद्रसिंह धोनीने 2020च्या ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी स्वत:ला पूर्णपणे सज्ज करण्याची खूणगाठ मनाशी बांधली, तर त्याला कोणीही अडवू शकणार नाही, असे मत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. या सामन्यानंतर धोनीने काही काळ विश्रांती घेतली तेव्हापासून तो पुनरागमन कधी करणार या चर्चांना ऊत आला.
धोनीला 15-16 वर्षांचा अनुभव असून त्याने जर पुनरागमन करायचे ठरवले, तर कोणीही त्याला रोखू शकत नाही.
तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेद्वारेही पुनरागमन करू शकतो, त्यापूर्वी तो आयपीएल स्पर्धेतही खेळेल व त्याची या स्पर्धेतील कामगिरीच त्याच्या पुनरागमनासाठी निर्णायक ठरेल, असेही शास्त्री यांनी स्पष्ट केले.