मुंबई – हैद्राबादच्या दौऱ्यावर गेलेल्या आदित्य ठाकरेंनी परतल्यानंतर भाजपावर तोफ डागली आहे. “भाजप आणि देवेंद्र फडणवीसांना शिवसेना संपवायची आहे. शिवसेना संपवणे हेच भाजपचे ध्येय, अशी टिका आदित्य यांनी मुंबईत दाखल झाल्यानंतर केली. हैदराबाद दौऱ्यात आदित्य ठाकरेंनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचीही भेट घेतली. त्यानंतर आदित्य आणि के टी राव यांची एक बैठकही झाली.
के टी राव हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांचे पुत्र असून ते तेलंगणाचे नगरविकास मंत्री आहे. खरंतर आदित्य हे हैदराबादमध्ये जाण्यामागील काय कारण असणार याबाबत राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.
एकीकडे बीआरएस पक्ष देखील महाराष्ट्रात प्रवेश करू इच्छित असताना आदित्यंचे त्यांना भेटणे हे येत्या काळातली नवी राजकीय चाल आहे की काय, अशी शंका देखील उपस्थित करण्यात येते आहे.
महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अरविंद केजरीवाल यांनीही मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबाची भेट घेतली होती. त्यामुळे ठाकरे गट येत्या निवडणूकांसाठी दंड थोपाटून तयारीला लागल्याचे चित्र आहे.