मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत त्यांचा ‘लाऊडस्पीकर’ असा उल्लेख केला होता. आता त्यांच्या याच टीकेला संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. आमचा लाऊडस्पीकर हा महाराष्ट्राच्या जनतेचा बुलंद आवाज आहे आणि तो तसाच घुमत राहील असे आणि भाड्याचे भोंगे आणि लाऊडस्पीकर यात फरक आहे , असे म्हणत फडणवीसांना उत्तर दिले आहे.
“आदित्य ठाकरेंचा दौऱा ठाण्यातून सुरु झाला आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला, सभांना, रोड शोला जो प्रतिसाद मिळत आहे, त्यासाठी उदंड हा शब्द कमी पडेल. ज्यांनी महाराष्ट्रात चोऱ्यामाऱ्या करुन सरकार स्थापन केलं त्यांच्यासाठी हे छातीत धडकी भडवणारं आहे. अनेक निष्ठावान शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू आले. अश्रूंच्या महापुरात हे सरकार वाहून गेल्याशिवाय राहणार नाही, ही भावना महाराष्ट्रात सर्वत्र दिसत आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“आम्ही भाजपाप्रमाणे सरकार कोसळेल असं लाऊडस्पीकरवरुन सांगणार नाही. त्यांच्या पिपाण्या वाजत होत्या. पण हे सरकार टिकणार नाही, बहुमत गमावेल, अंतर्गत कलाहाने पडेल. कोणाला काय बोलायचं आहे, पिपाण्या वाजवायच्या आहेत, सनई चौघडे वाजवायचे आहेत ते वाजवू द्या. आमचा लाऊडस्पीकर हा महाराष्ट्राच्या जनतेचा बुलंद आवाज आहे आणि तो तसाच घुमत राहील,” असे प्रतिपादन संजय राऊत यांनी यावेळी केले.
“शिवसेनेचा लाऊडस्पीकर ५६ वर्ष सुरु आहे. यावरील संदेश आणि गर्जना ऐकण्यासाठी महाराष्ट्र आणि देश एका निष्ठेने शिवेसनेच्या मागे उभा आहे. आधी सरकार स्थापन करा. एक महिन्यानंतरही तुम्ही ‘एक दुजे के लिये’ स्क्रिप्टमध्ये अडकून पडला आहात. किती वेळा दिल्ली जाणार आहात?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे. “त्यांना रोज उठून माझा लाऊडस्पीकर ऐकावा लागतो. ५६ वर्षांपासून सुरु असलेला शिवसेनेचा हा लाऊडस्पीकर उतरवण्याची हिंमत कोणी करु शकलेलं नाही. तुमच्या पिपाण्या लोकांनी बंद केले आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
चंद्रकांत पाटील यांनी मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं याविषयी विचारले असता, त्यांनी“भाजपामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. तिथे मनमोकळेपणाने मत व्यक्त करता येत नाही. तरीही मी चंद्रकांत पाटील यांचं अभिनंदन करतो, त्यांनी थोडा काळ कोल्हापुरचं पाणी दाखवलं. जे त्यांच्या पोटात मळमळत होतं, ते पोटावर आलं. भाजपाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे, असा खुलासाही त्यांना करावा लागला. त्या भावनेचा आदर व्हायला हवा होता”.
“आम्हाला जे बोलायचे ते आम्ही निर्भीडपणे बोलतो, परिणामाची पर्वा करत नाही. बाळासाहेबांची शिवसेना मराठी माणसाची भूमिका मांडच राहणार. फक्त सकाळी नाही तर २४ तास आम्ही बोलत राहू. आदित्य ठाकरेही दौऱ्यावर असून महाराष्ट्राला हवाहवासा वाटणारा लाऊडस्पीकर आहे. उद्धव ठाकरेही लवकर बाहेर पडणार असून बुलंद लाऊडस्पीकर दिसेल. प्रत्येक शिवसैनिकाचा आक्रोश, घराघरातील महिलेचा हुंदकाही लाऊडस्पीकर आहे. फडणवीसाजी हा लाऊस्पीकर तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा संजय राऊतांनी यावेळी दिला.